ऑनलाईन टीम / मुंबई :
ज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. ईडीच्या कारवाईबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. ईडी आणि भाजपची हातमिळवणी आहे. याची चौकशी व्हायला पाहीजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आले आहेत.
याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ईडी आणि भाजपची हातमिळवणी झाली असून शिवसेनेला टार्गेट केले जात आहे. तरी देखील शिवसेनेचे धैर्य खचणार नाही. तसेच ईडीने नोटीस पाठवल्यानंतर आमच्या चेहऱयावरचे हासू मावळलेले नाही. कर नाही त्याला डर कशाला, आम्ही सामोरे जाऊ. पण त्याचा तसुभरही परिणाम महाविकास आघाडी सरकारवर होणार नाही, आणि शिवसेनेचं मनोधैर्यही खचणार नाही, उलट ते अधिक मजबूत होईल. पुढे ते म्हणाले, ही कायदेशीर लढाई आहे, कायदेशीर लढाई त्याच पद्धतीने लढायच्या आहेत. अनिल परब हे कायदा क्षेत्रातले जाणकार आहेत, ते स्वतः वकिल आहेत, त्यांना माहित आहे काय करायचे ते असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
- दिल्लीत आमचेही येतील
सुडाची भावना आणि बिनबुडाचं राजकारण त्यातून या सर्व कारवाया सुरु आहेत. सर्वांचे दिवस येतात, दिल्लीत आमचेही येतील असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.