औद्योगिक क्षेत्रासह सेंट्रिंग, गवंडी कामांवर परिणाम : मालकवर्ग अडचणीत
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या बेळगाव परिसरात यात्रोत्सवांना जोर आला आहे. कोरोनानेही डोके वर काढले आहे. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रासह सेंट्रिंग, गवंडी, प्लंबिंग यासह इतर क्षेत्रांना बसू लागला आहे. याबाबत कामगार येत नाहीत तर आम्ही काय करायचे, अशी उत्तरे कंत्राटदार अनेकांना देत आहेत. कामगारांबाबत विचारले असता यात्रांना येणारी आमंत्रणे चुकविता येत नाहीत. प्रसंगी काम चुकले तरी चालेल, अशी मानसिकता कामगारांची झाली आहे. यातच कोरोनाचे संकटही आले आहे. त्यामुळे कामगार मिळणे कठीण झाले आहे.
परराज्यांतून आलेले कामगार मागील वषीच परतल्यामुळे स्थानिक कामगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, स्थानिक कामगार यात्रा आणि उत्सव यामध्ये गर्क झाला आहे. बराच कामगारवर्ग यात्रोत्सवात रमू लागला असून कामावर दांडी मारण्याचे प्रकार वाढले आहेत. शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींवर याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. कामगारवर्ग मोठय़ा संख्येने अनुपस्थित राहू लागल्याने बरीचशी कामे खोळंबू लागली आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम आर्थिक क्षेत्रावरही पडत आहे.
अवजड कामे करण्यास कोणीच तयार नाही. पूर्वी गवंडय़ांची संख्या जास्त होती. मात्र, आता ती कमी होत असून परराज्यांतून आणि परजिल्हय़ांतून येणाऱया कामगारवर्गावरच अधिक अवलंबून राहावे लागत आहे. स्थानिक कामगार हा कामापासून अलिप्त होताना दिसू लागला आहे. मात्र, भविष्यात सर्व क्षेत्रांना हा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
औद्योगिक वसाहतीवर मोठा परिणाम
नुकतीच हिंडलगा येथील महालक्ष्मी यात्रा, याचबरोबर गुंजेनहट्टी व इतर गावांतील यात्रा आयोजित केल्या होत्या. या सर्व यात्रा साधेपणाने करण्याचे आवाहन केले होते. तरीही यात्रोत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती. यात्रांचे कारण पुढे करून कामगारवर्ग एक तर सुटी मागतो किंवा दांडी मारतो. अशा प्रकारांमुळे उद्योजकवर्गाला मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा प्रकारांमुळे उद्यमबाग औद्योगिक वसाहतीवर मोठा परिणाम जाणवत आहे. या वसाहतीचा 80 टक्के कामगारवर्ग बेळगाव तालुक्मयासह इतर तालुक्मयांमधील आहे. बाहेरील कामगावर्गही येथे मोठय़ा प्रमाणात राहतो. मात्र, कोरोनामुळे परराज्यांतील कामगारवर्ग बेळगावकडे फिरकलाच नाही. यात्रोत्सवांचा फटका उद्यमबाग औद्योगिक वसाहतीबरोबरच मच्छे, होनगा, यमनापूर आदी वसाहतींवर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे बांधकाम विभागावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे.
यात्रांच्या काळात काम चुकले तरी चालेल ही मानसिकता कामगारवर्गात जास्त आहे. यात्रा म्हणजे सर्वत्र रंगीत बेत ठरलेले असतात. मांसाहारी जेवणावळी आणि इतर सोयी यामुळे सारेच जण त्याकडे आकर्षित होतात. रोजच्या मजुरीवर कामे करणाऱया कामगार वर्गाचाही याकडे ओढा अधिक असतो. कोणतेही काम न करता जेवणाची सोय झाली इतकाच विचार करणारी मंडळी या प्रकाराकडे पाहतात. मात्र, त्यांच्यावर अवलंबून असणारा मालकवर्ग अडचणीत सापडतो, असे चित्र आहे. आता लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यामध्ये आणखीनच भर पडणार, अशी भीती कंत्राटदार व्यक्त करत आहेत.
सर्वच उद्योगांवर यात्रांमुळे संक्रांत येऊ लागली आहे. विशेषतः मनुष्यबळावर आधारित उद्योग अडचणीत येऊ लागले आहेत. कामगारवर्गाने यात्रोत्सव करावेत, मात्र आपली दैनंदिन कामे आटोपूनच, अशा प्रतिक्रिया सध्या उमटू लागल्या आहेत. सध्याची वाढती महागाई आणि कोरोनाचे संकट पाहता इतर सण, उत्सव साजरे करण्यापेक्षा कामावर अधिक भर देणे गरजेचे आहे. अन्यथा, त्याचा फटका भावी पिढीला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.