वार्ताहर/ औंध
महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकमधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जगतजननी श्रीयमाईदेवीच्या पौषी उत्सवास 10 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्राकरुंना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.
यात्रा उत्सवानिमित्त कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी ग्रामस्थाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, चेअरमन रमेश जगदाळे, इलियास पटवेकरी, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, सचिन शिंदे, संतोष भोसले, आब्बास आत्तार, पोलीस पाटील वसंत जानकर, शंकरराव खैरमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शुक्रवारी 10 रोजी सायंकाळी ग्रामनिवासिनी यमाईदेवीच्या मंदिराशेजारील ऐतिहासिक दिपमाळ प्रज्वलित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी परंपरेनेनुसार देवीची षोडशोपचारे पूजा करून देवीची पालखीतून मिरवणूक छबिना काढण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता देवीची देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी यांच्या शुभहस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची रथात प्रतिष्ठापना रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी 12 रोजी क्रिकेटचे सामने होणार आहे. तसेच दि. 13 रोजी भन्नाट स्टँन्डट काँमेडी हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 16 रोजी खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रंगणार आहे. 17 रोजी श्वान स्पर्धा घेण्यात येणार आहेत. 19 रोजी ट्रक्टर रिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच 20 रोजी अश्व डान्स स्पर्धा होणार असून 22 रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे.
यात्रेसाठी येणारे दुकानदार व्यापारी, शेतकरी, आणि भाविकांचे आरोग्य, दिवाबत्ती, पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची ग्रामपंचायतीने खबरदारी घ्यावी. तसेच जनावरांच्या बाजारात शेतकऱयांना हॉटेल यांना देखील मार्केट कमेटीच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आणि यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी यात्रेतील विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी कमिटय़ांची चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक, वसंत माने, सदाशिव पवार, गणेश देशमुख,. शैलेश मिठारी, आप्पा इंगळे, संपत पवार, काका जगदाळे, किसन तनपुरे, युवक मंडळाचे कार्यकर्ते ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. हणमंतराव शिंदे यांनी प्रास्ताविक तर दीपक नलवडे यांनी आभार मानले.
सोमवारी 6 रोजी जागावाटप
श्रीयमाईदेवीच्या यात्रेनिमित्त दुकानदार, पाळणेवाले यांना जागावाटप करण्यासाठी सोमवार दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बैठकत आयोजित करण्यात आली आहे. यावेळी जागांचे वाटप करण्यात येणार आहे तरी व्यापारी, दुकानदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सरपंच सोनाली मिठारी यांनी केले.