भाजप, सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवतानाच राणे ज्या-ज्या ठिकाणी जातील, त्या-त्या ठिकाणी 250 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याची चोख तयारी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केली असून त्यांच्याच आदेशानुसार शिवसेना, भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱयांना त्या-त्या स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जनआशीर्वाद यात्रा पुन्हा 27 ऑगस्टपासून रत्नागिरीमधून सुरू होत असून सायंकाळी उशिरा सिंधुदुर्ग जिल्हय़ात दाखल होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात दोन दिवस यात्रा असून यात्रेदरम्यान पुन्हा शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने येऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्हय़ात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात्रा ज्या ठिकाणी जाईल, तेथे जिल्हय़ातील 150 पोलीस आणि जिल्हय़ाबाहेरील 100 पोलीस असा 250 पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी राहणार आहे. यामध्ये एसआरपीएचे जवान, दंगल नियंत्रण पथक तैनात असणार आहे.