मराठा आरक्षणप्रश्नी सरकार आणि विरोधकांना इशारा : 27 मे रोजी भूमिका जाहीर करणार
प्रतिनिधी / नाशिक, कोल्हापूर
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मार्ग काढण्याऐवजी राज्य सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. यापुढे मराठा समाजाचे हित आणि भावनांशी खेळाला तर याद राखा, हा संभाजीराजे तुमच्या आडवा आल्याशिवाय राहणार नाही, अशा खणखणीत इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे. येत्या 27 मे रोजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांची भेट घेतल्यानंतर आपण मराठा समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. तो पर्यंत सध्या कोरोनाचेही संकट आहे. त्यामुळे मराठा समाजाने संयम ठेवावा, असे आवाहनही संभाजीराजे यांनी मराठा बांधवांना केले.
नाशिक येथे पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारसह विरोधी पक्ष भाजप आणि मराठा विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले, 2007 पासून मी मराठा आरक्षणाची लढाई लढत आहे. राज्यात 58 मोर्चे काढून मराठा समाजाने आपल्या भावना मांडल्या. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर आता फडणवीस सरकारने केलेला कायदा बोगस होता, ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात सशक्तपणे बाजू मांडली नाही, अशी चर्चा सुरू आहे. अशा चर्चेत मला रस नाही. राज्य सरकार आणि विरोधी पक्षाकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे, तर विरोधी पक्ष राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत आहेत. दोघेही जबाबदारी एकमेकांवर झटक आहेत. मराठा समाजाच्या भावनांशी खेळत आहेत. पण त्यांनी लक्षात ठेवावे 2018 मध्ये मुंबईतील आझाद मैदानावरील 50 लाख मराठा बांधव जमले होते. त्यांना मी विनंती केली म्हणून सर्व जण माघारी फिरले. अन्यथा काय झाले असते? याची कल्पना सर्वांना आहे.
27 मे रोजी भूमिका जाहीर करणार
सध्या कोरोनाचे संकट आहे. अशा काळात सर्वोच्च न्यायालयात लढायची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरणे हे सोल्युशन नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी 27 मे पर्यंत संयम ठेवावा. तो पर्यंत मी नाशिकसह नांदेड, सोलापूरसह इतर जिल्हय़ात दौरा करून मराठा समाजासाठी त्याग करणाऱया विव्दान, तज्ञांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आरक्षणप्रश्नी माझ्याकडे सोल्युशन आहे. पण त्यासाठी सर्वांशी चर्चा केल्यानंतर आणखीन काही मुद्दे मिळू शकतात. 27 मे रोजी मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुंबईतच पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहे. मराठा समाजाची भूमिका हीच माझी भूमिका असणार आहे. त्यामुळे सर्व नेते, खासदार, आमदारांना विनंती आहे, त्यावेळी कुणी माघार घेतली, मराठा समाजाच्या आडवे आले तर हा संभाजीराजे आडवा आल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही संभाजीराजे यांनी दिला.
चारवेळा पत्रे पाठवून पंतप्रधान मोदींनी वेळ दिला नाही
मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा पत्रे पाठविली पण त्यांनी वेळ दिला नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी हातात असणाऱया गोष्टी कराव्यात
मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी हातात असणाऱया गोष्टी देखील केलेल्या नाहीत. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने असलेल्या सारथी संस्था मोडून काढली. 9 सफ्टेंबर 2020 पूर्वीच्या मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्या नियुक्त्याही ठाकरे सरकार केल्या नसल्याची खंतह संभाजीराजेंनी व्यक्त केली.
आक्रमक होण्यास दोन मिनिटे लागतात
संभाजीराजे शांत आहेत, बोलत नाहीत असे काही जण म्हणत आहेत, पण मी शांत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांचा मी वारस आहे. त्यांच्यातील जनहिताचा विचार, संयम आणि लढाऊ बाणा माझ्यात आहे. पण सध्या कोरोनाचे संकट आहे. अशावेळी रस्त्यावर उतरण्याऐवजी न्यायालयात लढावे लागणार आहे. त्यामुळे मी शांत आहे. आक्रमक होण्यास दोन मिनिटे लागतात. त्यामुळे लढा कसा लढायचा हे मला कुणीही शिकवू नये, असे संभाजीराजे म्हणाले.
भाजपची भूमिका सांगण्याचा ठेका मी घेतलेला नाही
मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलन, मोर्चात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. याविषयी या पत्रकार परिषदेत छेडले असता, संभाजीराजे म्हणाले, भाजपची भूमिका सांगण्याचा मी ठेका घेतलेला नाही. सत्ताधारी आणि विरोधक मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत.
संभाजीराजे म्हणाले….
महाराष्ट्र पिंजून काढून मराठा कार्यकर्ते, नेते, तज्ञांशी चर्चा करणार
-2018 च्या आझाद मैदानावरील मोर्चात असणारे नेते आज कुठे आहेत?
- कोरोनाच्या संकटात काही काळ संयम ठेवण्याची गरज
-सारथीची स्वायत्तता काढली आता शाहू महाराजांचेही नाव काढून टाका
-सर्व पक्षीय नेत्यांनी मराठा समाजाची दिशाभूल करू नये
-102 व्या घटना दुरूस्तीवरही 27 मे रोजी बोलणार - सत्ताधारी, विरोधकांनी आरक्षणावरील सोल्युशन विषयी बोलावे
-मराठा समाजाची भूमिका हीच माझी भूमिका