प्रतिनिधी / गडहिंग्लज
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेली टिप्पणी,त्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिलेले उत्तर, आणि त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या वादात घेतलेली उडी. या साऱ्याचा संदर्भ घेत नेहमी सडेतोड बोलणारे राष्ट्रवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पूर्णपणे बोलणे टाळत यापुढे आपण कोणावरच काही बोलणार नाही, असा यु टर्न घेत साऱ्यांना धक्का दिला.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ गुरुवारी सकाळी गडहिंग्लजच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी काल वाढदिवशी बोलायला नको होते पण ते बोलले. त्यांनी आम्हाला सर्कशीतील प्राणी ठरविले. पण आपण आता यापुढे बोलणार नाही. त्यांच्यावर टिका टाळत दैवयोगाने सत्ता मिळाली असून यावेळी असे नेटके काम करणार की आयुष्यभर लोक आपले नाव काढतील. त्यामुळे कोणावरही यापुढे आपण टिका करत राजकारण करण्यापेक्षा काम करत राहणार, असे स्पष्ट केले. चंद्रकांतदादांच्या एकूण टिकेलाच त्यांनी बगल देत बोलणे पुढे ढकलले. नेहमी जिल्हय़ाच्या राजकारणात या दोन नेत्यांचे आरोप – प्रत्यारोप, कोपरखळय़ा लगावणे चाललेले असते. आज मात्र मंत्री मुश्रीफ यांनी घेतलेला यु टर्न किती दिवस राहणार ? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
ग्रामपंचायतीवर प्रशासक येणारच मुदत संपलेल्या राज्यातील 1566 आणि लवकरच मुदत संपणाऱया 12 हजार 668 ग्रामपंचायतीवर प्रशासक येणारच, हे स्पष्ट आहे. न्यायालयाचा निर्णय, घटना दुरुस्ती यामुळे अडचण झाली असून विद्यमान सरपंचांना मुदतवाढ देता येणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. मात्र आता प्रशासक नेमण्याचे अधिकार मिळाले असून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून प्रशासक नेमले जाणार आहेत. त्यात विद्यमान सरपंचांच्या संबंधीतांना संधी देता येते का ? याची चाचपणी करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. |