केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार आर्थिक विकासाचा वेग वाढविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योग जगताला हे आश्वासन दिले असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून या आर्थिक वर्षात 5 सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार आहे.
त्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत बोलत होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत थेट विदेशी गुंतवणुकीत यावर्षी आतापर्यंत 37 टक्के वाढ झाली आहे. ही विक्रमी वाढ आहे. तसेच परकीय चलन साठा जुलैत मोठ्या प्रमाणात वाढला असून 620 अब्ज डॉलर्सपर्यंत (साधारणतः 45 लाख 88 हजार कोटी रुपये) पोहचला आहे. केंद्र सरकार आणखी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा करणार आहे. कोरोना संसर्गामुळे जे निर्बंध घालावे लागले आहेत, ते संपल्यानंतर आर्थिक विकासाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी सर्व पूर्वतयारी करण्यात आली असून या तयारीचे परिणाम लवकरच दिसण्यास प्रारंभ होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कोणत्या कंपन्या ?
केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीचे 1 लाख 75 हजार कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित पेले आहे. त्यासाठी एअर इंडिया, भारत पेट्रोलियम, बीईएमएल, शिपिंग कॉर्पोरेशन आणि कंटेनर कॉर्पोरेशन या पाच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. कोरोना काळातही अर्थव्यवस्थेला उभार मिळावा यासाठी केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेच्यासह काम करीत आहे. रिझर्व्ह बँकेकडून लिक्विडिटी कमी करण्याजोगी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. भारत आशिया खंडातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे, असे अनेक मुद्दे निर्मला सीताराम यांनी त्यांच्या भाषणात विशद केले.
महागाईला रोखण्याचा निर्धार
जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढलेली असून सरकारला या मुद्दय़ाची जाणीव आहे. सर्वसामान्यांना या महागाईचा त्रास होत आहे, ही बाबही सरकारने गंभीरपणे समजून घेतली आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून अनेक उपाय केले जात आहेत. त्यांचे परिणामही भविष्यकाळात दिसणार आहेत. ‘विकास’ हाच सरकारचा मूलमंत्र राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.