ऑनलाईन टीम / कोलकता
भारताच्या अनेक राज्यांना चक्रीवादळ तडाका कमी जास्त प्रमाणात बसत असून यामूळे वेगवेगळ्या राज्यातील प्रशासन आवश्यक ते निर्णय घेत आहे. तसेच सद्यस्थितीत भारताच्या पूर्व किनारपट्टीवर संभाव्य ”यास” चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील २४ परगणाला धोका ओळखत तात्काळ यंत्रणा राबवणे आवश्यक आहे. म्हणूनच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली असून मंगळवारी रात्रभर त्या नबाना येथील नियंत्रण कक्षातच ठाण मांडून बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
या वादळाचा फटका पश्चिम बंगालच्या किनारी भागांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, कोस्ट गार्डसह भारतीय नौदल सज्ज झालं आहे. २६ मे रोजी सकाळी यास चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर थडकणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
यास चक्रीवादळ सुमारे १८५ किलोमीटर प्रतितास वेगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर धडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी बचावकार्य आणि पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत रात्रभर नियंत्रण कक्षात थांबण्याचा निर्णय घेतला आहे.