ऑनलाईन टीम / कोलकाता :
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने ‘यास’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे वादळ ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटांपासून आता ईशान्येकडे सरकत आहे. वादळाची तीव्रता वाढली असून, त्याचा वेग ताशी 185 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात ओडिशा-बंगालच्या किनाणाऱ्याला धडकणार आहे.
नुकत्याच येऊन गेलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवदाळापेक्षा हे वादळ तुफानी असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजपासून या राज्यांमध्ये पावसाला सुरूवात होईल. महाराष्ट्राला या वादळाचा फटका बसणार नाही. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे.
या चक्रीवादळावर नजर ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने राज्य सचिवालयात एक नियंत्रण कक्ष उघडले आहे. ओडिशा सरकारनेही या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बचाव पथके तयार ठेवली आहेत. संवेदनशील प्रदेशातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, तसेच किनारी भागातही राहू नये, असा इशारा देण्यात आला आहे.