कोलकाता, रांची / वृत्तसंस्था
भारताच्या पूर्व किनारपट्टीला बुधवारी ‘यास’ चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. विशेषतः पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या वादळाने मोठे नुकसान केले असून झारखंडमध्येही मोठा फटका बसू शकतो. पूर्व किनाऱयावर लँडफॉल झाल्यानंतर वादळाने उत्तर आणि उत्तर-पश्चिम असा प्रवास सुरू केला. मध्यरात्रीनंतर झारखंडमध्ये तडाखा बसण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये 1 कोटी लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला असून तब्बल 3 लाख घरे कोसळल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.
ओडिशामधील बालासोर आणि भद्रक जिह्यात प्रामुख्याने जोरदार वारा आणि पावसामुळे अनेक भागात पडझड झाली आहे. पश्चिम बंगालमध्येही नॉर्थ 24 परगणा येथील परिस्थितीही विदारक झाली आहे. समुद्राचे पाणी दीघा शहरात शिरल्यामुळे दोन्ही राज्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. चक्रीवादळ पारादीप आणि सागर द्वीप दरम्यान, उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकले. समुद्रांच्या लाटांनी किनारपट्टीला हादरे बसल्यामुळे ओडिशा राज्यातून सुमारे 14 लाख आणि बंगालमधून साधारण 5 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोलकाता शहरात 74 ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले होते. समुद्रकिनारपट्टीच्या हानीबरोबरच घरे, झाडे, विद्युततारा आणि मोठय़ा इमारतींचेही नुकसान झाले आहे. अनेक भागात झाडे घरांवर व विजेच्या तारांवर कोसळल्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चक्रीवादळानंतर बरसू लागलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाल्याचे चित्रही दिसून येत होते.
ओडिशा राज्यातील 8 जिह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. ओडिशा-बंगाल राज्यांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने यास चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधानांनी आंध्रप्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांच्या मुख्यमंत्री आणि पुदुच्चेरी राज्याच्या उपराज्यपालांसोबत चर्चा करत चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
ओडिशातही प्रचंड नुकसान
उत्तर ओडिशामध्ये असणाऱया धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल 120 ते 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱया वाऱयांनिशी हे चक्रीवादळ धडकल्यामुळे किनारी भागात असणाऱया घरांचे आणि नागरी सुविधांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करण्यामध्ये आघाडीवर आहेत. चक्रीवादळ धडकून गेल्यानंतर बुधवारी दुपारपासून राज्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीलाही सुरुवात झाली होती. वादळ आणि पावसामुळे 27 मे रोजी दुपारपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर ओडिशाच्या किनाऱयावरील धामरा आणि बालासोर यांच्यामध्ये या चक्रीवादळाचा लँडफॉल झाला. यावेळी किनारी भागात तब्बल 120 ते 140 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते.
पश्चिम बंगालनंतर झारखंडच्या दिशेने
ओडिशासोबतच पश्चिम बंगालच्या किनारी भागातल्या इस्ट मिदनापूर आणि साऊथ 24 परगणा या भागांना देखील वादळाचा तडाखा बसला. मात्र, तोपर्यंत चक्रीवादळाचा वेग ताशी 90 किलोमीटर इतका कमी झाला होता. पश्चिम बंगालनंतर चक्रीवादळाने झारखंडच्या दिशेने मोर्चा वळवला होता. आता झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे. या तिन्ही राज्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. झारखंडमध्ये सखल भागांमध्ये राहणाऱया नागरिकांना बुधवारी सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होते.