ऑनलाईन टीम / पुणे :
विद्वेषाच्या भावना प्रबळ होत गेल्याने विचारवंतांची विभागणी होऊन राजसत्ता ही विचारवंतांकडे किंवा साहित्यिकांकडे येण्याऐवजी धर्मसत्तेकडे जाणे पसंत करू लागली आहे, हे खेदजनक चित्र आहे. समाजातील विचारवंतांनी देखील डावे-उजवे आदी सर्व भेद, भाव, व्देष, कल दूर सारून समान व्यासपीठावर एकत्र येऊन समाजाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले पाहिजे, असे मत प्रसिद्ध लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा, पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, विचारवंत आणि वक्ते स्व. डाॅ. निर्मलकुमार फडकुले यांचा स्मृतीदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा आज आयोजीत करण्यात आला होता, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रा. जोशी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक गिरीष प्रभुणे यांना जीवनगाैरव पुरस्कार, डाॅ. संभाजी मलघे यांना ‘आचार्यदर्शन’ या ग्रंथासाठी आणि प्रा. जे.पी.देसाई यांना ‘माझी भाषणे, प्रसंग आणि आठवणी’ या ग्रंथासाठी साहित्य पुरस्कार तर पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, जे शिक्षण पोटाला भाकरी देऊ शकत नसेल ते शिक्षण निरूपयोगी आहे. पोटाला आधार होऊ शकेल एवढे सामर्थ्य आजच्या शिक्षण व्यवस्थेत नाही. महासत्तेची स्वप्न पहात असतांना तरूणांच्या मनातील हा आक्रोश आपण शमवू शकलो नाही, त्यांच्या पोटाला प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर त्या तरूण पिढीचा होणारा विस्फोट भयावह असेल. विचाराविचारांमध्ये मतमतांतरे असून शकतात. मतभिन्नता असूनही चांगले काम कोणी उभे करीत असेल तर त्या कामास पाठींबा दिला गेला पाहिजे. कट्टरता ही विचारवंत आणि साहित्यिक यांना न शोभणारी गोष्ट आहे. साहित्यात समाज परिवर्तनाची ताकद असते. ती ताकद ओळखून साहित्यिकांनी काम केले पाहिजे.