तामिळनाडूतील मदुराईनजीकचे गाव
सध्याच्या काळात लोक चप्पल-बुटांसह एक पाऊलही चालू शकत नाहीत, पण तुम्ही कधी बूट-चप्पलांशिवाय कायमस्वरुपी राहू शकता का? बहुधा तुम्ही याची कल्पना देखील करू शकत नाही. पण भारतात एक असे गाव आहे, जेथे बूट-चप्पल घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे. याच्यावर तुमचा विश्वास बसणार नसला तरीही हेच सत्य आहे.
हे गाव दक्षिण भारतातील राज्य तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूचे प्रसिद्ध शहर मदुराईपासून 20 किलोमीटर अंतरावर कलिमायन हे गाव आहे. या गावातील लोक स्वतःच्या मुलामुलींना चप्पल किंवा बूट घालू देत नाहीत. जर या गावात कुणी चुकून चप्पल किंवा बूट घातल्यास त्याला कठोर शिक्षा करण्यात येते.
या गावातील लोक अपाच्छी नावाच्या देवतेची शतकांपासून पूजा करत राहिले आहेत. अपाच्छी देवता आपले रक्षण करते असे ते मानतात. स्वतःच्या देवतेबद्दलच्या श्रद्धेपोटी गावाच्या सीमेत चप्पल-बूट परिधान करण्यावर बंदी आहे.
या गावात राहणारे लोक शतकांपासून ही अजब परंपरा पार पाडत आहेत. जर कुणाला गावाबाहेर जायचे असल्यास तो हातात चप्पल किंवा बूट घेऊन जातो आणि गावाची वेस ओलांडल्यावर ते पायात घालतो. त्यानंतर गावात परतताना गावच्या वेशीपूर्वी चप्पल किंवा बूट पुन्हा हातात घेतो. ही परंपरा कधीपासून चालत आली आहे याची कल्पना कुणालाच नाही. पण अनेक पिढय़ांपासून या गावातील लोक या परंपरेचे पालन करत आहेत. येथील मुले शाळेत देखील अनवाणी पायांनीच जातात. येथील लोक चप्पल-बूटाचा उल्लेख केल्यास नाराज होतात. भारतात अशा अनेक अजब परंपरा आहेत, ज्यांचे लोक पालन करत असतात.