ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनामुळे दिर्घकाळ बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयेही सुरू होणार आहेत. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
सामंत म्हणाले, राज्यातील महाविद्यालये येत्या 20 ऑक्टोबरपासून सुरू होतील. महाविद्यालयांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नियमावली असेल. जिल्ह्यांमधील परिस्थिती पाहून ते ठरवले जाईल. मात्र, विद्यार्थ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नाही, अथवा एकच डोस झाला आहे. त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या उपस्थिती संदर्भातील अधिकार स्थानिक प्रशासनाला असतील. तसेच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येणे शक्य होणार नाही, त्यांच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय महाविद्यालयांनी करावी, असेही सामंत यांनी म्हटले आहे.