ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
इराणच्या दक्षिणेकडील तटावर असलेले चाबहार बंदर भारत विकसित करत आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून या बंदरावर पोहचण्यासाठी कमी अंतर पार करावे लागेल, त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च 20 टक्क्यांनी कमी होणार आहे, असे केंद्रीय मंत्री मनसुखलाल मंडाविया यांनी सांगितले.
भारतातून इतर देशांना माल पुरवठा करण्यासाठी चीन किंवा युरोपातील इतर मार्गाचा वापर करावा लागत होता. हे अंतर जास्त असल्याने भारताने इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्याचा निर्णय घेतला. हे बंदर सिस्तान-बलुचिस्तान प्रांताच्या जवळ आहे. पार्शियन आखाताच्या बाहेर हे बंदर असल्याने पाकिस्तानला टाळून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून या बंदरात पोहचणे सोपे आहे.
भारताला रशिया, उझबेकिस्तान, आर्मेनिया, अझरबैझान, बेलारूस, कझाकस्तान आणि किरगीजस्तानला माल पुरवठा करण्यासाठी या बंदराचा उपयोग होणार आहे. या बंदरामुळे वाहतुकीचे अंतर कमी होऊन 20 टक्क्यांपर्यंत खर्च वाचेल, असे मंडाविया यांनी म्हटले आहे.