ऑनलाईन टीम / मुंबई :
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा मृत्यू, पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा सहभाग आणि परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब या सगळ्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता रिपल्बिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे.
ते म्हणाले, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. तसेच महाराष्ट्रात दलितांवर अत्याचाराच्या घटनाही वाढलेल्या आहेत, म्हणूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे गरजेचे आहे. राज्यातील परिस्थितीबाबतची माहिती देतानाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करणारे पत्र अमित शहा यांच्या कार्यालयात आज पाठवले आहे, असे सांगितले.
संजय राऊत हे अनिल देशमुख यांना संपुर्ण प्रकरणात पाठीशी घालत असले तरीही प्रत्यक्षात या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज असल्याचे आठवले म्हणाले. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अतिशय गंभीर आरोप लावल्याचे आठवले म्हणाले. त्यामुळेच राष्ट्रपती राजवट लावल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.