ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी अनेक राज्यांनी शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या कमी आल्यानंतर काही राज्यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही राज्ये अशी देखील आहेत जे कोरोनाची लस आल्यानंतर शाळा सुरू करण्याच्या विचारात आहेत.
- शाळा सुरू करणारी राज्ये :
बिहार :
बिहार सरकारने 4 जानेवारीपासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या सरकारी आणि खाजगी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे सक्तीचे असणार आहे. तसेच शाळेत येताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मास्क लावणे बंधनकारक असणार आहे. यशोबतच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
महाराष्ट्र :
महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 4 जानेवारी पासून सुरू होत आहेत. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.
राजस्थान :
राजस्थान सरकारने देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकार, 4 जानेवारी पासून इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे सक्तीचे असणार आहे. यासोबत सर्वांना मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे.
झारखंड :
झारखंडमध्ये बोर्डाच्या होणाऱ्या आगामी परीक्षांमुळे केवळ 10 वी आणि 12 वींच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यासह सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच विद्यार्थ्यांना ऑड ईव्हन फॉर्म्युला नुसार येण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दिल्ली :
दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामूळे जो पर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे.
आसाम :
आसाम सरकारने देखील 1 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश :
उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षा परिषद प्रदेशमध्ये इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, शाळा नक्की कोणत्या दिवशी सुरू केल्या जातील याबाबत निर्णय झालेला नाही आहे.