ऑनलाईन टीम / अमरावती :
आंध्र प्रदेश सरकारने शाळा सुरू करण्याची तारीख निश्चित केली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या तारखेनुसार, राज्यात 5 सप्टेंबरपासून शाळा सुरू केल्या जातील. मात्र, त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णयात बदल देखील होऊ शकतो, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर शिक्षणमंत्री आदिमलापु सुरेश यांनी सांगितले की, शाळा उघडण्यासाठी सरकारने 5 सप्टेंबरची तारीख निश्चित केली आहे, परंतु त्यावेळची परिस्थिती पाहून, त्यावेळीच अंतिम निर्णय घेण्यात येईल.
पुढे ते म्हणाले, जो पर्यंत शाळा सुरू होत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी रेशन दिले जाईल. तसेच आंध्र प्रदेश सरकार पुढील सत्रापासून प्री-प्राइमरी म्हणजेच एलकेजी आणि यूकेजी देखील शाळांमध्ये सुरु करण्याचा विचार करीत आहे. राज्यात EAMCET, JEE, IIIT यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग क्लासेस सुरु केले जातील. जिल्हास्तरावर संयुक्त संचालक स्तरीय पद तयार केलं जाईल, जेणेकरुन राज्यातील शिक्षणाची पातळी सुधारली जाऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.