जम्मू-काश्मीरसंबंधी केले हेते विधान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे अध्यक्ष वोल्कन बोज्किर यांच्या जम्मू-काश्मीरसंबंधीच्या विधानावर भारताने आक्षेप घेतला आहे. बोज्किर यांचे विधान पक्षपाती असल्याचे भारताने म्हटले आहे. युएनजीए अध्यक्षांनी जम्मू-काश्मीर मुद्दय़ाची तुलना पॅलेस्टाईनशी केली होती. काश्मीर मुद्दय़ाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर मजबुतीने मांडणे पाकिस्तानचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले होते.
संयुक्त राष्ट्रसंघ पदाधिकाऱयाचे विधान स्वीकारार्ह नाही. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे अध्यक्ष वोल्कन बोज्किर यांनी जम्मू-काश्मीरसंबंधी दिलेल्या अनुचित संदर्भांना आम्ही तीव्र विरोध दर्शवितो. अन्य जागतिक स्थितींची तुलना करण्याचा प्रत्यक्षात कुठलाच आधार नाही. युएनजीए अध्यक्षांचे विधान दिशाभूल करणारे आणि पूर्वग्रहदुषित आहे. त्यांच्या या विधानामुळे संबंधित पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याची भूमिका भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी मांडली आहे.
बोज्किर यांनी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यासोबत चर्चा केली होती. जम्मू-काश्मीरचा दर्जा प्रभावित होईल अशी पावले उचलणे दोन्ही देशांनी टाळायला हवी असे त्यांनी म्हटले होते. संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीर मुद्दा उपस्थित करणे पाकिस्तानचे कर्तव्य होते असेही त्यांनी नमूद केले होते.
जम्मू-काश्मीर मुद्दय़ावर संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका युएन चार्टरद्वारे निश्चित होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1972 मध्ये झालेला शिमला करार जम्मू-काश्मीरचा मुद्दा युएन चार्टरनुसरा शांततापूर्ण मार्गाने सोडविण्यात यावा असे म्हणतो असे बोज्किर यांनी पाकिस्तानात म्हटले होते.
कुरैशी यांच्या आमंत्रणावर बोज्किर पाकिस्तानात पोहोचले होते. तेथे त्यांनी पाकिस्तानच्या अनेक मोठय़ा नेत्यांची भेट घेतली होती. पाक पंतप्रधान इम्रान खान आणि विदेश मंत्री कुरैशी यांची त्यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली होती.