दहशतवाद पसरविण्यासाठी दोषी : पाक एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये
वृत्तसंस्था /संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून भारताने दहशतवादाला आश्रय देणे आणि त्याच्या फैलावावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. मागील अनेक दशकांपासून भारत विशेषकरून सीमेपलिकडून होणाऱया दहशतवादाला तोंड देत आहे. दहशतवादी कारवायांचे समर्थन करणे आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याप्रकरणी काही देश उघडपणे गुन्हेगार आहेत, असे म्हणत भारताने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला सुनावले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ति यांनी दहशतवादविरोधी सप्ताहादरम्यान पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. ‘कोविड-19 नंतरच्या स्थितीत दहशतवादाला होणारे वित्तपोषण रोखणे’ असे शीर्षक असलेल्या उच्चस्तरीय ऑनलाईन कार्यक्रमात तिरुमूर्ति यांनी दहशतवादाच्या धोक्याला यशस्वीपणे हाताळण्यासाठी आर्थिक साधनांपर्यंत दहशतवाद्यांना पोहोचण्यापासून रोखणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
सीमापार दहशतवादाची समस्या
भारत मागील अनेक दशकांपासून दहशतवादाला तोंड देत आहे. विशेषकरून सीमेपलिकडून होणाऱया दहशतवादाला भारत सामोरा जात आहे. दहशतवादाला आर्थिक बळ उपलब्ध करविण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक क्षमता तसेच कायदेशीर व्यवस्थेचा अभाव असणारे काही देश आहे. तर काही अन्य देश दहशतवादाला मदत करणे आणि दहशतवाद्यांना आर्थिक सहकार्य तसेच आश्रय देण्याप्रकरणी उघडपणे दोषी असल्याचे तिरुमूर्ति म्हणाले.
जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान
अक्षम देशांच्या क्षमता निश्चितपणे वाढवाव्या लागतील. तर आंतरराष्ट्रीय समुदायाने दोषींचा जाहीर नामोल्लेख करावा, तसेच त्यांना जबाबदार धरावे असे तिरुमूर्ति यांनी म्हटले आहे. तिरुमूर्ति यांचे हे विधान पाकिस्तानला लक्ष्य करणारे होते. दहशतवादाला वित्तीय सहाय्य पुरविण्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्य, एफएटीएफला मजबूत करणे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवादविरोधी व्यवस्थेला अधिक निधी उपलब्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद पेले आहे.