ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’ मोहिम राबवत आहे. काही तास युद्ध थांबवून लोकांना बाहेर काढले जात आहे. या बचावकार्यात भारताने पाकिस्तान, नेपाळ, टय़ुनिशियासह इतर देशांच्या अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आहे. अशाच प्रकारे 9 बांग्लादेशींना सुखरूप युक्रेनबाहेर काढल्याबद्दल बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भारतीय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थीनी अस्मा शफीकची देखील युद्धग्रस्त युक्रेन भागातून सुटका केली आहे. त्याबद्दल तिने मोदी सरकार आणि किव्हमधील भारतीय दुतावासाचे आभार मानल्याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला होता.
दरम्यान, मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनमधील सुमीमधून सर्व भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याचे सांगितले होते. सुमीमध्ये रशियन सैन्य जोरदार बॉम्बवर्षाव करत होतं, पण पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे लोकांना काही तासांचा वेळ देण्यात आला आणि लोकांना त्वरीत बाहेर काढण्यात आलं. आतापर्यंत 18,000 भारतीयांना विशेष उड्डाणांद्वारे मायदेशी परत आणण्यात आले आहे.