सरकारच्या सूचनेनुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणार
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार राणी चन्नम्मा विद्यापीठ अंतिम वर्षाच्या युजी आणि पीजीच्या परीक्षा सप्टेंबर 30 पूर्वी घेण्याचा विचार करत आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कक्षेत बेळगाव, विजापूर आणि बागलकोट येथील विद्यार्थी शिकतात. एकूण 45 हजार विद्यार्थी असून कोविड-19 मुळे एप्रिलमध्ये ते अंतिम वर्षाची परीक्षा देऊ शकले नाहीत.
आता सरकारच्या सूचनेनुसार युजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या परीक्षा तेवढय़ाच घेतल्या जातील. अन्य विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाईल. आयोगाच्या सूचनेनुसार 30 सप्टेंबरपूर्वी आम्हाला परीक्षा घेणे भाग आहे. याबाबत कुलगुरुंच्या समितीने सरकारला परीक्षेचे वेळापत्रकही सादर केले आहे, असे कुलगुरु एम. रामचंद्रगौडा यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा सुरळीतपणे देता यावी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या हेतूने परीक्षेपूर्वी सदर विद्यार्थ्यांचे 10 ते 15 दिवस आधी वर्ग घेतले जातील. त्यामुळे लॉकडाऊनमुळे स्थगित झालेला अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना शिकवला जाईल. कोविडच्या नियमांचे पालन करूनच विद्यापीठ परीक्षांचे आयोजन करेल, असे कुलगुरुंनी स्पष्ट केले आहे.