भाजपबरोबर नकारच, आचारसंहितेपूर्वी रथयात्रा काढणार, सुदिन ढवळीकर यांची घोषणा
प्रतिनिधी /पणजी
भाजपला हवी आहे मगोची युती. मात्र मगो पक्षाने आता कडक धोरण स्वीकारले आहे. पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतर कधीही होऊ शकतो, असे निवेदन केले आणि डिसेंबरमध्ये आचारसंहिता सुरू होण्याअगोदर संपूर्ण गोव्यात पक्षातर्फे रथयात्रा काढली जाईल, असे जाहीर केले. तथापि, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मगो-भाजप हे समविचारी पक्ष आहेत. गोव्यात बाहेरून येऊन अराजकता माजविण्यासाठी काही राजकीय पक्ष येत असल्याने त्यांना तोंड देण्यासाठी मगो-भाजप एकत्र येणे ही काळाची गरज असे म्हटले आहे.
गेल्या 3 दिवसांपूर्वी केंद्रीय आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाजपची मगोबरोबर युतीसंदर्भात आपण सुदिन ढवळीकर यांच्याशी चर्चा करणार असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपने मगोबाबत थोडे नरमाईचे धोरण स्वीकारले. यासंदर्भात मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना भाजपबरोबर युती आता शक्य नाही. मगो पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपबरोबर युती करायची नाही, असा ठाम निर्णय घेतलेला आहे व पक्षाच्या केंद्रीय समितीच्या निर्णयाविरोधात आपल्याला जाता येणार नाही. परिणामी हा भाजपशी युतीबाबतचा निर्णय हा विषयच आता कालबाहय़ ठरल्यात जमा आहे.
भाजपने नेहमीच मगो पक्षाला संपविण्याचा प्रयत्न केलेला आहे. चार वेळा भाजपने मगो पक्षाच्या विश्वासघात केला आता भाजपची गोव्यातील स्थिती अत्यंत खराब झालेली आहे. हे लक्षात आल्याने भाजप नेते युतीसाठी प्रयत्न करतात. 1999 मध्ये तत्कालीन केंद्रीय नेते प्रमोद महाजन यांनी रात्री 1 वा. सिदाद-द-गोवा येथे भाजपने मगोशी युती तोडलेली आहे, असे जाहीर केले होते. युती त्यांनी तोडली. 2002 मध्ये भाजपने मगोशी संबंध तोडल्यानंतरही पर्रीकर मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी मगोने पाठिंबा दिला. 2007 मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर यावे यासाठी मगोने काँग्रेस सरकारमधून बाहेर पडून फार मोठी जोखीम पत्करली आम्हाला काँग्रेस नेत्यांनी अपात्र ठरविले तर भाजप नेते आमच्या पाठिशी न रहाता आमचा विश्वासघात केला.
विश्वासघातक्यांबरोबर युती अशक्य
2012 मध्ये मगोने भाजपशी युती केली. सरकार सत्तेवर आले. पर्रीकर दिल्लीत गेल्यानंतर भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मगोच्या दोन्ही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे सरकार कोसळले. जनतेने झिडकारले. केवळ नितीन गडकरींच्या एका फोनवर विश्वास ठेवून भाजपला मदत केली. भाजपचे सरकार सत्तेवर आणले तर डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रीकरांच्या निधनानंतर मगो पक्षाचे दोन आमदार पळविले व आम्हाला मंत्रिमंडळातून काढले. अशा विश्वासघातकी पक्षाबरोबर मगो युती करूच शकत नाही, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
रथयात्रा म्हणजे परिवर्तन यात्रा असेल
सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, दि. 15 डिसेंबर नंतरच मगो पक्ष भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्यास तयार आहे. कोणत्या पक्षाबरोबर युती करायची हा निर्णय त्यानंतर होईल. तत्पूर्वी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ाच्या अखेरीस गोव्यात रथयात्रा काढणार आहे. ही यात्रा म्हणजे परिवर्तन यात्रा असेल.
मगो-भाजप समविचारी पक्ष : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना युतीबाबत विचारले असता या पक्षाबरोबर युतीची बोलणी चालू आहे. पक्षाचे केंद्रातील वरिष्ठ नेते हे मगोबरोबर चर्चा करतील. परंतु मगो-भाजप हे दोन्ही समविचारी पक्ष आहे. सध्या गोव्याबाहेरून येत असलेल्या राजकीय पक्षांचे उद्दिष्ट गोव्यात अराजकता माजविण्याचे, त्यांना योग्य पद्धतीने उत्तर देण्यासाठी मगो-भाजप या समविचारी पक्षांनी एकत्र येणे. यातून गोव्याची स्वतंत्र अस्मिता गोंयकारपण आणि गोमंतकीयत्व टिकवून ठेवण्यास संस्कृतीचे सवंर्धन करणे शक्य होईल. आमचे युतीसाठी प्रयत्न जारी आहेत, मात्र मागीलवेळी मंत्रिमंडळातून सुदिनना का वगळले ? याचे कारण त्यांनाही माहीत आहे. सरकार चालविताना प्रत्येक घटकाने युतीच्या धर्माचे पालन करणे आवश्यक आहे.
मगो-भाजप युती झाली तर नेमका कोणाला लाभ होणार, असे विचारता ते काळच ठरविल. मगोकडे युती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेत असतात. त्यामुळे आम्ही राज्याच्या हिताच्यादृष्टीने अराजकता माजविणाऱया पक्षांचे राजकारण इथे रुजू नये यासाठी मगो-भाजप एकत्र येणे हे गोव्यासाठी येथील जनतेच्या हिताचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
युतीची बोलणी चालू आहे : तानावडे
दरम्यान, मगो-भाजप युतीची बोलणी चालू असल्याचा दावा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला. पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुदिन ढवळीकरांबरोबर बोलणी चालू केलेली आहे. अद्याप त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु मला खात्री आहे. मगो-भाजप हे समविचारी पक्ष असल्याने दोन्ही पक्षांदरम्यान समाधानकारकच तोडगा निघेल, आणि गोव्यात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेवर येणार असल्याने मगो पक्षालाही भाजपबरोबर येणे महत्त्वाचे आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असल्याने स्थानिक पातळीवर आम्ही त्याबाबत कोणतेही भाष्य करू शकत नाही. परंतु युती होईल, बोलणी चालू आहे, असे तानावडे म्हणाले.