नौदलाची ताकद आणखी भक्कम ः कोलकाता शिपयार्डमध्ये निर्मिती
कोलकाता / वृत्तसंस्था
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी कोलकाता येथे ‘आयएनएस दुनागिरी’ ही युद्धनौका राष्ट्राला समर्पित केली. हुगळी येथील जलपात्रात ती लाँच करण्यात आली. उत्तराखंडमधील एका शिखरावरून नामकरण केलेली ही युद्धनौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स म्हणजेच कोलकाता येथील जीआरएसई शिपयार्डने बनवली आहे. भारतीय नौदलात ही युद्धनौका दाखल झाल्यामुळे भारताची समुद्रातील ताकद वाढली आहे. दुनागिरी या युद्धनौकेतील 75 टक्के शस्त्रे, उपकरणे आणि यंत्रणा भारतीय नौदल संचालनालयाने तयार केली आहे.
भारताची स्वदेशी बनावटीची दुनागिरी युद्धनौका नौदलाकडे सुपुर्द करण्यात आली आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेडने तयार केलेली ही दुसरी ‘प्रोजेक्ट-17-ए’ युद्धनौका आहे. दुनागिरीमध्ये यापूर्वीच्या तुलनेत उत्तम स्टेल्थ फिचर्स, प्रगत शस्त्रे, सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आली आहे. ‘दुनागिरी’ युद्धनौकेच्या उद्घाटन सोहळय़ाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नेव्ही वाईव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा कला हरी कुमार यादेखील उपस्थित होत्या.
संरक्षणमंत्र्यांनी दिला ‘संजीवनी बूटी’चा संदर्भ
‘दुनागिरी’ युद्धनौकेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी हनुमानजी आणि संजीवनी बूटीचा संदर्भ देत एक मोठी गोष्ट सांगितली. ही युद्धनौका आमच्यासाठी मोठी संपत्ती ठरेल. भगवान लक्ष्मणासाठी ‘संजीवनी बूटी’ आणण्यासाठी भगवान हनुमानाने संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणला होता. त्याचप्रमाणे आता ‘द्रोणागिरी’ किंवा ‘दुनागिरी’ देखील कोणत्याही परिस्थितीत आपले कार्य पार पाडण्यास सक्षम असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले.
स्वदेशी बनावटीमुळे अर्थव्यवस्थेला चालना
सद्यस्थितीत नौदलाच्या उपकरणांचे 88 टक्के करार भारतीय उद्योगांशी केले जात आहेत. त्यापैकी 1.75 लाख कोटींची गुंतवणूक प्रगतीपथावर आहे. अशाप्रकारे, नौदलाच्या खरेदीसाठी खर्च केलेल्या प्रत्येक 10 कोटी रुपयांपैकी 9 कोटी रुपये आपल्या अर्थव्यवस्थेला परत केले जातात, असे नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
पर्वतांच्या नावावरून युद्धनौकांचे नामकरण
नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली ‘दुनागिरी’ ही मालिकेतील चौथी युद्धनौका आहे. नौदलासाठी शिवालिक वर्गाची एकूण सात जहाजे बांधली जात आहेत. मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे चार तर कोलकात्यातील जीआरएसई शिपयार्डवर तीन युद्धनौकांची जबाबदारी आहे. माझगाव डॉकयार्ड येथे या वर्गाच्या दोन युद्धनौका यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. तिसरी युद्धनौका उदयगिरीही सज्ज झाली आहे. सदर सात युद्धनौकांना देशातील विविध पर्वतरांगांवरून नावे देण्यात आली आहेत.