राष्ट्रीय फॉरेन्सिक संस्थेतील परिषदेत तज्ञांचे मत : देशभरातील 40 फॉरेन्सिक तज्ञांचा सहभाग
प्रतिनिधी /फोंडा
भूकंप किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती तसेच युद्धात मोठय़ा प्रमाणात मृत पावणाऱया व्यक्तींची ओळख पटविणे हे फॉरेन्सिक म्हणजेच न्याय वैद्यक क्षेत्रातील तज्ञांपुढे मोठे आव्हान आहे. त्यावर ठोस उपाय योजना व ऍक्शन प्लॅन यावर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांची परिषद नुकतीच कुर्टी फोंडा येथील राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान संस्थेत पार पडली. देशभरातील चाळीस फॉरेन्सिक तज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते.
नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा युद्धबळींची ओळख पटविण्यासाठी वेळेत योग्य उपाय योजना कशा पद्धतीने आखता येतील यावर या परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सेंटर फॉर ह्युमेनीटरियन फॉरेन्सिक्स आणि आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय न्याय वैद्यक संस्थेचे संचालक प्रा. एस. ओ. ज्युनेरी, रेडक्रॉसच्या पथकाचे प्रमुख जॅन मिस्कॉक, रेडक्रॉसच्या एशिया पॅसिफिक विभागाचे फॉरेन्सिक व्यवस्थापक डॉ. उडो क्रेन्झर हे उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात यांनी फॉरेन्सिकच्या माध्यमातून मृतांची ओळख पटविण्याची प्रगत शास्त्रीय पद्धत विकसित करण्यावर भर दिला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे असोसिएट प्रा. डॉ. मंदार कंटक व डॉ. मधू घोडकीरेकर यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
जॅन मिस्कॉक यांनी आपत्तकालीन दुर्घटनामध्ये मृतांची ओळख पटविण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे फॉरेन्सिक तज्ञांसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगून त्यासंबंधी पद्धतशीर व योग्य उपचार पद्धतीची गरज व्यक्त केली. त्याचबरोबरच योग्य उपकरणाचा वापर तसेच मृतदेह हाताळताना शास्त्रीय पद्धतीचा योग्य वापर झाला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. अशा आपत्तीमध्ये मृत पावणारी व्यक्तीच केवळ पिढीत नसते तर त्याचे कुटुंबीयही पिढीत ठरतात. अश कठीण परिस्थितीत (युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती) आपत्तकालीन मृतांची वेळीच ओळख न पटल्यास त्याच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आवश्यक मृत्यू दाखला मिळणेही कठीण होऊन बसते. ज्यामुळे मृतबळींना नुकसान भरपाई मिळण्यास विलंब लागतो. त्यांच्या उत्तराधिकाऱयांना मालमत्ता व इतर गोष्टींमध्येही अनेक कायदेशीर अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अशा मृतांची ओळख पटविणे हे फॉरेन्सिक क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले आहे. त्यावर सुलभ व प्रभावी उपचार पद्धती शोधणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेचे दुसरे सत्र कोलवा येथे झाले. आपत्तकालीन मृतांची ओळख पटविण्यासाठी प्रभावी ऍक्शन प्लॅन तयार करणे काळाची गरज आहे. ज्यामुळे मृतांची ओळख पटवितानाच सदर व्यक्ती व त्याच्या उत्तराधिकाऱयांना न्याय मिळेल. तसेच आपत्तकालीन पिढीतांच्या पुर्नवसनासाठी मदत होईल असा विचारही फॉरेन्सिक तज्ञांनी परिषदेत मांडला.