ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप विरोधात होत असणाऱ्या यूपीए आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी मी घेणार नाही. पण विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे सहकार्य लागेल ते मी कारेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात दिली. भाजप विरोधात देशांत ज्यांची नाराजी आहे. आणि ज्या पक्षाचा विस्तार देशभर आहे. अशा पक्षाने पुढे यावे, असे आवाहन करत पवार यांनी महागाई विरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं.
पवार पुढे म्हणाले लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधी पक्ष सक्षम असायला हवा, नाहीतर रशियाचे राष्टध्यक्ष पुतीन सारखा होऊन बसेल असं विधान पवार यांनी केलं.
ईडीच्या कारवाईवर बोलताना पवार यांनी, सध्या देशात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. सत्तेचा वापर करण्यासाठी आम्ही त्या संस्कारात वाढलेलो नाही. त्यामुळे यापूर्वी आम्ही तपास यंत्रणेचा कधी वापर केला नाही. असेही शरद पवार म्हणाले. ईडी हा शब्द कोणाला माहित होता का? पण भाजपमुळे तो सर्वांना माहिती झाला. आज यांच्या घरी तर उद्या त्यांच्या घरी जातात, पण कोल्हापुरात कधी येऊन गेले तर मी पाहुणे येऊन गेले का? असे विचारतो असा टोला शरद पवार यांनी लगावला.
पुढे शरद पवार म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये रोज वाढत आहेत. हे कधी पाहिलं नव्हतं. भाजपचे राज्य आल्यानंतर इंधनाच्या किमती भरमसाठ वाढत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. या सगळ्यांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागत आहेत. मात्र या मुद्द्यांवर केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. एक काळ असा होता ज्यावेळी महागाईच्या विरोधात भाजप गळ्यात कांद्याच्या माळा घालून रस्त्यावर उतरला होता, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.
सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका या सत्ताधारी पक्षाने घेतली आहे. आपण भारतीय आहोत ही भावना रुजवण्याऐवजी वेगळं वातावरण जाणीवपूर्वक तयार केलं जात आहे. काश्मीर फाईल्स चित्रपटावरून नागरिकांत संताप निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तर ती घटना घडली त्यावेळी सरकार कोणाचं होतं त्यांना पाठिंबा कोणाचा होता? हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे. भारतात राहायचं असं म्हणणाऱ्या मुस्लिम आणि हिंदुत्व लोकांवर देखील हल्ले केले. तिथल्या लोकांनी नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी साधने पुरवली होती हा इतिहास असतानाही अशी फिल्म बनवणे चुकीचं आहे. जनमानसात विष पेरण्याचं काम भाजप करत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.