अमित शाह यांचे वक्तव्य : अखिलेश यादवांवर सडकून टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी बदायूंच्या सहसवानमध्ये प्रचारसभा घेतली आहे. कलम 370 हटविण्यास सप-बसप आणि काँग्रेसने विरोध केला होता. कलम 370 हटविल्यास रक्ताचे पाट वाहतील असे अखिलेश म्हणायचे. रक्ताचे पाट वाहण्याचे सोडून द्या, दगड हाती घेण्याचीही कुणाची हिंमत झाली नाही असे विधान शाह यांनी केले आहे.
उत्तरप्रदेशात मागील 5 वर्षांमध्ये माफिया तसेच बाहुबली दिसून आले नाहीत. येथे केवळ बजरंगबलीच दिसून येतात. मुलायम किंवा अखिलेश मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत आझम खान, अतीक अहमद आणि मुख्तार अंसारी यासारखे लोक दिसायचे. परंतु मागील 3 वर्षांपासून हे लोक कुणालाच दिसले नसतील, कारण सर्वजण तुरुंगात आहेत असे उद्गार शाह यांनी काढले.
शाह यांनी बदायूंच्या सहसवान मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार डी.के. भारद्वाज यांच्यासाठी प्रचारसभा घेतली आहे. प्रत्येक घरात गॅस सिलिंडर, शौचालय आणि वीज पोहोचविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. योगी सरकारच्या काळात गरीबाची जमीन हिसकाविण्याची किंवा कुणाच्या बहिण-मुलीकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची हिंमत कुणाची नसल्याचे ते म्हणाले.
कल्याण सिंह यांचा उल्लेख
तत्पूर्वी अमित शाह यांनी अतरौली येथील सभेत बोलताना कल्याण सिंह यांचा उल्लेख केला. कल्याण सिंह यांनी रामजन्मभूमीसाठी हसत हसत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राममंदिराचे काम सुरू असल्याचे पाहून त्यांच्या आत्म्याला आनंद होत असावा असे शाह यांनी म्हटले आहे. उत्तरप्रदेशात माफिया एक तर तुरुंगात आहेत किंवा समाजवादी पक्षाच्या यादीत दिसून येतात. योगी सरकारने राज्यात कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम केले आहे. गुन्हय़ांचे प्रमाण कमी झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.
छाप्यांमुळे अखिलेश यांना वेदना
समाजवादी अत्तरवाल्याच्या घरात 250 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम सापडली. या इसमासोबत आपले नाते काय हे सांगण्याची अखिलेश यांची तयारी नाही. नातेच नसेल तर छाप्यांमुळे वेदना का होत आहेत? बुआ-भतीजे (आत्या-भाचा) सरकारमध्ये मोफत गॅस सिलिंडर मिळत नाही. 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची व्यवस्था भाजप सरकारने केली असल्याचे शाह म्हणाले.