शेतकऱयांना नाडवून दुकानदारांकडून जादा दराने खतांची विक्री
प्रतिनिधी / कोल्हापूर
‘कोरोना’ महामारीच्या काळातही जिह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात रासायनिक खतांची उपलब्धता असून शेतकऱयांना खतांची टंचाई भासणार नाही, असे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. कृषी विभागाकडूनही खत उपलब्धतेच्या आकडेवारीचा खेळ सुरु आहे. पण वस्तुस्थिती पाहता जिह्यातील बहुतांशी शेतकरी गेल्या महिन्याभरापासून युरियासह इतर आवश्यक संयुक्त खतांच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या ऊसासह इतर पिकांना खतांची मात्रा देण्याचा कालावधी आहे. खरीप हंगाम देखील तोंडावर आला आहे. या काळातच जिह्यात युरीया खताचा दुष्काळ आहे. तर काही कृषि सेवा केंद्रचालक व सहकारी संघांकडून युरियाची साठेबाजी केल्यामुळेही युरियाची टंचाई झाल्याचे चित्र आहे.
युरिया अभावी पिकांना खतांची मात्रा देण्याचे काम ठप्प झाले आहे. तर काही कृषि दूकानदारांकडे युरीया उपलब्ध असूनही टंचाई असल्याचे भासवून जादा दराने विक्री केली जात आहे. प्रत्येक गोणीमागे शेतकऱयांकडून 30 ते 50 रूपये जादा दर घेतला जात असून अनेक कृषी सेवा केंद्रामध्ये लिंकींगद्वारे विक्री केली जात आहे. यामध्ये इतर खते, तणनाशके, टॉनिक, बियाणे आदी कृषीपूरक वस्तू शेतकऱयांच्या माथी मारल्या जात आहेत. ही लिंकींग प्रक्रिया कंपनीकडूनच कृषी सेवा केंद्रांवर लादली जात आहे.
युरियाची टंचाई असताना जिल्हा प्रशासनाकडून मात्र कोणतीही हालचाल केली जात नाही. एकूण रासायनिक खतापैकी सुमारे 50 टक्के वापर हा युरीयाचा केला जातो. रासायनिक खतांमध्ये युरीया हा अतिशय महत्वाचा घटक आहे. सध्या जिह्यात रब्बी पिकांचा हंगाम संपला असून खरीपाची चाहूल लागली आहे. तर पुर्वहंगामी ऊस लावणीच्या भरणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे इतर रासायनिक खतांबरोबरच युरियाची नितांत गरज आहे. बहुतांशी शेतकरी सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि युरीया अशी सरळ खते वापरतात. त्यामुळे शेतकऱयांकडून फॉस्फेट आणि पोटॅश बरोबरच युरीया खतास जास्त मागणी आहे. तसेच 10ः26ः26ः, 12ः32ः16, 18ः18ः10, 15ः15ः15, आदी संयुक्त खतामध्येही प्रतिगोणी 10 ते 15 किलोच्या प्रमाणामध्ये युरियाचा वापर करावा लागतो.
शेतकऱयांकडून मोठी मागणी लक्षात घेऊन ज्या कृषि सेवा केंद्रांकडे युरिया शिल्लक आहे, त्यांच्याकडून गोणीमागे 30 ते 50 रूपये जादा दराने विक्री सुरू आहे. कृषी सेवा केंद्रचालकांकडून जादा दराने विक्री केल्याबाबत रीतसर पावती केली जात नाही. एखाद्याने खत खरेदीची पावती मागितल्यास त्यांना युरिया देण्यास नकार दिला जातो. तसेच ज्या कृषी सेवा केंद्राकडून लिंकींगद्वारे युरियाची विक्री केली जाते, त्यांच्याकडूनही खरेदीच्या पावतीवर लिंकींगच्या वस्तूची नोंद केली जात नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱयाच्या तक्रारीनुसार कृषी अधिकाऱयाने संबंधित कृषी दुकानाची तपासणी केल्यास तो दुकानदार त्यामध्ये दोषी आढळत नाही. तसेच तालुका पातळीवरील कृषी अधिकाऱयांचे आणि कृषी सेवा केंद्रचालकांचे साटेलोटे असल्यामुळे त्यांच्याकडूनही कृषीसेवा केंद्रांच्या मनमानी कारभाराकडे जाणिवपुर्वक दूर्लक्ष केले जात आहे. कृषी अधिकाऱयांना एखादा कृषी सेवा केंद्रचालक दोषी आढळल्यास त्याच्याकडून वरकमाई घेऊन त्यांच्या गैरकारभारावर पडदा टाकला जात असल्याचे शेतकऱयांचे मत आहे. शासनाच्या कृषी खात्याने मात्र आंधळ्याचे सेंग घेतले आहे.
सहकारी संघांकडे युरियाचा मोठा साठा
‘कोरोना’ संकटकाळात सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून नियमित धान्यासोबतच मोफत तांदूळ दिला जात आहे. अप्राधान्य शिधापत्रिकाधारकांनाही धान्य उपलब्ध केले आहे. हे धान्य मालगाडीतून कोल्हापूरात आणले जाते. जिल्हा प्रशासनाकडून मालगाडीतून धान्य आणण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे खत आणण्यासाठी मालगाडीच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.
साठेबाजी करून वाढीव दराने विक्री केल्यास कारवाई
जिह्यात एप्रिलअखेर 148 टक्के (मागणीपेक्षा 48 टक्के जादा) युरिया खतांची उपलब्धता झाली आहे. युरिया खतांचा पुरवठा करणाऱया कंपन्यांकडून कोणत्या कृषि दुकानास किती युरिया दिला, त्याची माहिती मागवली असून त्यानुसार दुकानांची चौकशी करणार आहे. यामध्ये साठेबाजी करून जादा दराने युरियाची विक्री करणाऱया दुकानदाराबाबत शेतकऱयांनी तालुका गुणनियंत्रक निरिक्षक किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अथवा कृषि विकास अधिकाऱयांना दुरध्वनीद्वारे तक्रार द्यावी. त्यांच्यावर त्वरीत कारवाई केली जाईल.