शेतकऱयांसाठी त्यांच्या कापणीला आलेल्या पिकाचे संरक्षण हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. कित्येकदा पीक तयार झाल्यानंतर त्याच्यावर जंगली जनावरांचा हल्ला होता आणि उभे पीक नष्ट होऊ शकते. तसे झाल्यास शेतकऱयाचे सर्व कष्ट वाया जातात. या समस्येवर दिल्लीचा 24 वर्षीय युवक अभय शर्मा याने प्रभावी उपाय शोधून काढला आहे. त्याने एका यंत्राची निर्मिती केली असून ते पिकांचे संरक्षण करण्यास आणि जनावरांना पिकांपासून दूर ठेवण्यास सक्षम आहे.
अभय शर्मा इंजिनिअर असून एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. बालपणापासून ते निसर्गप्रेमी राहिले आहेत. ते शिकत असताना 2016 मध्ये उत्तराखंड येथील एका गावात सहलीला गेले होते. तेथे त्यांनी जंगली जनावरे उभ्या पिकांची हानी कशी करतात आणि त्यामुळे शेतकरी कसा मेटाकुटीला येतो हे प्रत्यक्ष पाहिले. त्यातून त्यांना हे यंत्र शोधून काढण्याची प्रेरणा मिळाली.
त्यांनी आपल्या मोठय़ा बहिणीच्या साहाय्याने या यंत्राचे डिझाईन बनविले. यासाठी इंटरनेटवरून महत्त्वपूर्ण माहिती घेतली. या यंत्राचे विविध सुटेभाग त्यांनी जवळच्या कारखान्यांम्धून तयार करून घेतले आणि ते जोडून यंत्र बनविले. जंगली जनावरे शेताच्या आसपास आल्यास हे यंत्र शेतकऱयाला वेळेवर सूचना देते. तसेच यंत्रातून येणाऱया मोठय़ा आवाजामुळे जनावरे दूर पळतात. अशाप्रकारे जंगलांजवळ असलेल्या शेतांमधील पिकांचे संरक्षण होते. अनेक शेतकऱयांनी हे यंत्रण आपल्या शेतांमध्ये बसवून घेतले असून आता अभय शर्मा यांची उलाढाल दीड कोटीची आहे.