बिगर गोमंतकीयांच्या दादागिरीला लगाम घाला
प्रतिनिधी / मडगाव
दियालगोना-नावेली सेन्वी पिरीस (34) या युवकावर शुल्लक कारणावरून खुनी हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले असून मडगाव व नावेली परिसरात बेकायदेशीर झोपडय़ा बांधून राहणाऱयावर सरकारने त्वरित कारवाई करावी अशी मागणी नावेलीतील नागरिकांनी केली आहे.
या खुनी हल्ल्याप्रकरणी फकीरबांद-मडगाव येथील आयुब सय्यद (26) व मूळ छत्तीसगढ राज्यातील व सध्या कालकोंडा-मडगाव येथील अनिलकुमार (37) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेली कार बाजुला काढ असे सांगणाऱया सेन्वी पिरीस याच्यावर खारेबांद-मडगाव येथे खुनी हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यानंतर नावेलीतील स्थानिक नागरिक एकत्र आले असून त्यांनी बिगर गोमंतकीयांची गोव्यात दादागिरी वाढली असून सरकारने वेळीच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा स्थानिकांनाच कायदा हातात घ्यावा लागणार असल्याचा इशारा दिला आहे. राजकीय व्यक्तीं केवळ मतांवर डोळा ठेऊन या लोकांची पाठराखण करीत असल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे.
दक्षिण गोव्याचे माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांनी देखील फेसबुकच्या माध्यमांतून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कार हटविण्याच्या विनंतीवरून नावेली येथील तरुणांवर खुनी हल्ला झाला. त्याकडे दुसरी घटना म्हणून पाहण्याची चूक करू नये. एक कुरूप संस्कृती डोके वर काढत आहे, अगदी गोव्यातील नीति आणि त्याच्या अस्तित्वाला आव्हान देत आहे. मते बळकट करण्याच्या वेषात मतांच्या बँका तयार करु नका. अशा बँकांमधील ठेवी फायद्याचे ठरणार नाहीत. परंतु, या राज्याची संस्कृती, चारित्र्य आणि रचना नष्ट करतील. ही वेळ गोव्यासाठी एकत्र राहण्याची आहे.
आपच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी देखील या प्रकारावर तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली असून बिगर गोमंतकीयांची दादागिरी या पुढे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. हे बिगर गोमंतकीय बेकायदेशीर या ठिकाणी राहतात व उलट गोवेकरांनाच त्रास देतात. राजकीय व्यक्तींचा या लोकांना पाठिंबा मिळत असल्यानेच त्यांची दादागिरी वाढल्याचे म्हटले आहे.
सेन्वी पिरीस हा युवक एकदम शांत स्वभाचा, कुणाच्या अध्यात न मध्यात जाणारा. या युवकावर खुनी हल्ला करणाऱयांना माफ केले जाणार नसल्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. नावेली येवून या पुढे कोणी ही दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायमची हद्दल घडविली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आमदार व मंत्र्यांना ही इशारा
बिगर गोमंतकीयांच्या गुंडगिरीला खत-पाणी घालणाऱया आमदार व मंत्र्यांना देखील योग्य तो धडा शिकवू असा इशारा नावेलीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. केवळ निवडणुकीसाठी मत पेठी म्हणून त्यांना संरक्षण देण्याचे आत्ता बंद करा व त्यांना गोव्यातून माघारी पाठवा अशी मागणी देखील स्थानिकांनी केली आहे. फकीरबांद, मोतीडोंगर तसेच इतर झोपडय़ापटय़ांनी हे गुन्हेगार आश्रय घेतात. या झोपडपट्टीवर सरकारने त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.