विजयी होणाऱयांना नेमणार प्रवक्तेपदी
प्रतिनिधी /पणजी
युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ या नावाने भाषण स्पर्धा 18 ते 35 वयोगटातील तरुण-तरुणींसाठी आयोजित करण्यात आली आहे. गोव्यात ती दोन्ही जिल्हा व राज्य पातळीवर होणार आहे. त्यात विजयी होणाऱयांना युवक काँग्रेस राज्य प्रवक्तेपदी नेमणार आहे.
युवक काँग्रेसचे गोवा-प्रभारी व स्पर्धेचे प्रमुख मैनुद्दीन एच. जे. यांनी पणजीत पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन याच्या पेस्टरचे प्रकाशन केले. तरुण पिढीला व्यासपीठ देण्यासाठी हा उपक्रम आखण्यात आला असून 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्षात ती स्पर्धा चालू होणार आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी प्रत्येक राज्यातून विजयी ठरलेल्यांची अंतिम स्पर्धा दिल्लीत होणार असून तेथे विजयी होणाऱयांना राष्ट्रीय प्रवक्तेपदी नेमले जाणार आहे. या स्पर्धेत राज्य पातळीवर स्थानिक विषय, प्रश्न, समस्या यावर बोलायचे असून दिल्लीतील स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील विषय, प्रश्नांवर चर्चा भाषणातून करायची आहे. स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने नेंदणी करायची असून त्यानंतर स्पर्धेची तारीख जागा निश्चित करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत गौतम भगत, विवेक डिसिल्वा, ग्लेन काब्राल उपस्थित होते.