सोशल मीडियाचा विस्तार जसजसा वाढत गेला तसतशी देशभरातील, पर्यायाने स्थानिक पातळीवरीलही युवावर्ग जागृत होतो, असे दिसून येते. एखाद्या गोष्टीबद्दल व्यक्त होण्याची मानसिकता या युवा वर्गामध्ये मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली. नुसते व्यक्त होणे नव्हे तर व्यक्त होण्याबरोबरच देशभरात निर्माण होत असलेल्या समस्यांवर, घडत असलेल्या घटनांवर क्रिया-प्रतिक्रिया ठरवण्याची एक पद्धत युवा वर्गामध्ये निर्माण होत आहे.
मध्यंतरीचा काळ थोडा वेगळा होता. युवावर्गाने फक्त आपल्या विकासावर भर द्यावा. अभ्यास प्रगती, रोजगार, करियर यासारख्या गोष्टींकडे लक्ष द्यावं. समाजात काय चाललंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. या प्रकारची मानसिकता निर्माण केली जात होती. त्या मानसिकतेतून ज्या युवा पिढीवर देशाची पुढची विकासाची कमान अवलंबून आहे ती पिढीच महत्वाच्या गोष्टींपासून अलिप्त आहे की काय? असं म्हणावं लागेल अशी ती परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आजच्या परिस्थितीत तसे न होता युवावर्गही देशातील दैनंदिन स्वरूपातील घटना घडामोडीकडे आकर्षित होऊ लागलाय. बदल होऊ लागलाय. आपल्याला कसा देश हवा आहे, देशाची परिस्थिती कशी आहे, ते सांगण्याची मानसिकता तयार होतेय.
यामध्ये मोठा वाटा आहे सोशल मीडियाचा. या मीडियाच्या माध्यमातून युवावर्गाला एकत्रित येण्याची संघटित होण्याची आणि संघटितपणे विचार मांडण्याची जागा मिळू लागली आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या विषयावर विचार मांडायचा झाल्यास स्वतंत्र कार्यक्रम करायचा. त्यांनी एका ठिकाणी जमून व्यासपीठावर विचार व्यक्त करावे लागत होते .मात्र आता सध्याच्या काळात मोबाईल हेच व्यासपीठ झाले असून ब्लॉग आणि सोशल मीडिया साईटच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त करण्याची पद्धत रूढ होत आहे. हे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. प्रामुख्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि त्यानंतर करिअरकडे वळलेले तरुण-तरुणी हे आपल्या करिअरच्या बरोबरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून देश धर्म आणि विकासाच्या बाबतीत आपले मत व्यक्त करू लागले आहेत.
या परिस्थितीने देशासमोर चांगले आश्वासक वातावरण निर्माण केले आहे. तरुण पिढी देशाची पुढची कमान हाती घेण्यासाठी सक्षम होऊ लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात जागृत झालेल्या तरुणाईचा उदय आणि त्यातील देश नक्कीच पुढे जाईल, अशी आशा व्यक्त करूया.