भारतीय युवा संघाची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकाबरोबर
वृत्तसंस्था/ बार्बाडोस
आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला विंडीजमध्ये शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया भारतीय युवा संघाचा सलामीचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिका युवा संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी समस्येमुळे संपूर्ण जग अस्थिर बनले आहे. तरीही आयसीसीची ही स्पर्धा आयोजकांनी या समस्येमुळे लांबणीवर टाकण्याचे टाळले आहे. भारतीय युवा संघाची या स्पर्धेसाठी यापूर्वीच निवड घाईघाईने करण्यात आली. भारतीय युवा संघाला सरावासाठी पुरेसा कालावधी मिळू शकला नाही. संघात निवडलेल्या काही खेळाडूंना केवळ सहा महिन्यांचा सराव मिळाला असल्याने भारतीय संघाला कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. भारतीय युवा संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय युवा संघामध्ये विशेष परिचित खेळाडूचा समावेश नाही. भारतीय युवा संघातूनच कर्णधार विराट कोहली, गौतम गंभीर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत हे दर्जेदार खेळाडू राष्ट्रीय संघाला यापूर्वी मिळाले आहेत.
कोरोना महामारी समस्येमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत स्पर्धात्मक क्रेकेटची उणीव खेळाडूंना खूपच भासली आहे. बेंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तत्कालिन प्रमुख राहुल द्रविड यांनी युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून ते उपलब्ध करून दिले. पण आता या प्रक्रियेमध्ये खंड पडत असल्याने सध्याच्या भारतीय युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शनाची उणीव भासली आहे. राहुल द्रविडने यापूर्वी भारताला अनेक नवोदित दर्जेदार क्रेकेटपटू उपलब्ध करून दिले आहेत. पण आता भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी द्रविडची नियुक्ती झाल्यानंतर ही प्रक्रिया खूपच थंडावलेली दिसते.
गेल्या ऑक्टोबरमध्ये 19 वर्षाखालील वयोगटासाठी सरावाकरिता चॅलेंजर करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये 5 संघांचा समावेश होता. पण भारतीय युवा संघासाठी ही स्पर्धा सरावाच्या दृष्टीकोनातून पुरेशी ठरू शकणार नाही. गेल्याच महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदाची सूत्रे व्हीव्हीएस लक्ष्मणने घेतली. भारतीय युवा संघाला ऋषीकेश कानिटकर हे प्रशिक्षक म्हणून लाभले आहेत. आयसीसीच्या विश्व युवा चषक क्रिकेट स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघासमोर केवळ 45 दिवसांचा कालावधी उपलब्ध राहिला. या कालावधीत भारतीय युवा संघाची निवड घाईतच करण्यात आली. यश धुळकडे संघाचे नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. 2012 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी विश्व युवा चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद भारताने पटकाविले होते.