ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात योगी सरकारने प्रस्तावित केलेल्या धर्मांतराच्या विधेयकाला राज्यपालांनी शनिवारी मंजुरी दिली. त्यामुळे आजपासून उत्तरप्रदेशात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू होणार आहे.
उत्तरप्रदेश सरकारने बुधवारी धर्मांतर प्रतिबंधक अध्यादेशाचा मसुदा राज्यपालांच्या मंजुरीसाठी राजभवनाकडे पाठवला होता. त्याला आज राज्यपालांनी मंजुरी दिली. मंजुरी मिळताच या अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता सहा महिन्यांत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा अध्यादेश मंजूर करावा लागेल.
खोटे बोलून किंवा फसवणूक करून धर्म बदलू नये, म्हणून योगी सरकारने हा अध्यादेश काढला आहे. जर मुलीचा धर्म केवळ लग्नासाठी बदलला तर असे लग्न अवैध ठरवून 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते.
अध्यादेशानुसार, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात रूपांतर करण्यासाठी संबंधित पक्षांना विहित प्राधिकरणासमोर जाहीर करावे लागेल, की हा धर्म पूर्णपणे ऐच्छिक आहे. तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही, अथवा प्रलोभने दाखवली गेली नाहीत.