ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशात चार महिन्यानंतर होणाऱया विधानसभा निवडणुका लक्षात घेता आज सायंकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जितिन प्रसाद यांच्यासह सात मंत्री शपथ घेतील. जितिन यांच्याशिवाय मंत्र्यांमध्ये पटलू राम, संजय गौर, संगीता बिंद, दिनेश खाटीक, धरमवीर प्रजापती आणि छत्रपती गंगवार यांचा समावेश आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशचे भक्कम प्रतिनिधित्व आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशमधून प्रथमच विक्रमी 15 मंत्री करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या निवडणुका गांभीर्याने घेण्यात येत आहेत. केंद्रीय निवडणुकांचे प्रभारी मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही तीन दिवस उत्तर प्रदेशमध्ये राहून मतदानाच्या तयारीवर चर्चा केली.
दरम्यान, भाजप कार्यकाळात गेल्या साडेचार वर्षांत उत्तर प्रदेश विकासाच्या मार्गावर गेला आहे. आता राज्यात गुंतवणुकीचे वातावरण असून भ्रष्टाचार आणि निकृष्ट कायदा व सुव्यवस्थेपासून राज्याला दिलासा मिळाला आहे. जनता पुन्हा एकदा भाजप सरकार निवडून देईल. 2022 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात 350 जागा जिंकून भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.