ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर योगी सरकारमधील बलाढय़ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी तडकाफडकी मंत्रीपदाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर आज पर्यावरणमंत्री दारा सिंह चौहान यांनीही राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. उत्तरप्रदेशात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दारा सिंह चौहान यांनी राज्यपालांना आपल्या राजीनाम्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. मी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये वन, पर्यावरण आणि उद्यानमंत्री म्हणून संबंधित विभागात मोलाचं योगदान दिलं. मात्र, दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळे, मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असे दारा सिंह यांनी या पत्रात म्हटले आहे.
2015 मध्ये दारा सिंह चौहान यांनी बसपाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. तीन वेळा खासदार राहिलेल्या चौहान यांना भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाचे सदस्यत्व दिले होते. मधुबन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला आहे.