ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेला ‘थ्री टी’ फॉर्म्युला हिट ठरताना दिसत आहे. मागील 24 तासात प्रदेशात 3.12 लाख टेस्ट करून देखील केवळ 1497 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रदेशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.6 % इतके झाले आहे.
प्रदेशात 30 एप्रिल रोजी रुग्णांची संख्या 3,10,783 इतकी होती. त्या प्रमाणात एका महिन्यात 88.1% घट झाली आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 37,044 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मागील 24 तासात प्रदेशातील संसर्ग दर केवळ 0.5 % इतका आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्य राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेशात आंशिक कर्फ्यू जारी करण्यात आला होता. या काळात आर्थिक व्यवहार देखील सुरू होते. प्रदेशात गहू खरेदी करण्यात आली. साखर कारखाने सुरू होते आणि व्यापारिक कार्य देखील सुरू होते.
प्रदेशात आतापर्यंत 1 कोटी 80 लाख 11 हजार 760 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर 18 ते 44 वयोगटातील 19,83,968 नागरिकांना लसींचे कव्हर प्राप्त झाले आहे. जून महिन्यापर्यंत 1 कोटी नागरिकांना लस संरक्षण देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.