ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील आणखी तीन जिल्ह्यांमध्ये कोरोना कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे. लाखीमपूर खीली, गाजीपूर आणि जौनपूर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 600 पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे आजपासून केवळ कन्टोनमेंट झोन वगळता सर्व भागातील बाजार सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या सर्व जिल्ह्यांमध्ये विकेंड आणि नाईट कर्फ्यू जारी असणार आहे. त्यामुळे आता आंशिक कोरोना कर्फ्यू केवळ 11 शहरांमध्ये असेल, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी दिली.
नवीन नियमावलीमध्ये सांगण्यात आले आहे की, बाजारात गर्दी होऊ नये, यासाठी दुकानदार आणि नागरिकांना दिशा निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दर शनिवारी आणि रविवारी साप्ताहिक लॉकडाऊन असणार आहे. या दोन दिवशी सॅनिटायझेशनचे काम केले जाणार आहे. यासोबत हे देखील सांगण्यात आले आहे की, जर या जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने 600 चा टप्पा ओलांडला तर आता देण्यात आलेली सूट बंद करून परत पाहिल्याप्रमाणे निर्बंध घातले जातील.
आता कोरोना कर्फ्यूमध्ये काही प्रमाणात सूट दिली असली तरी या काळात शाळा बंदच असतील आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण सुरू असेल. बाजारामध्ये मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान, सरकारी कार्यालये 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केली जाणार आहेत. औद्योगिक संस्था सुरू असतील. यासोबतच एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन तसेच बसमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. यासोबतच अजूनही शाळा, महाविद्यालये, स्विमिग पूल, सिनेमा हॉल, बागा अजूनही बंदच असणार आहेत.