वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
यावर्षी होणाऱया यू-16 एएफसी चॅम्पियनशिप स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला असून भारताला कठीण ड्रॉ मिळाला आहे. भारताचा क गटात समावेश असून याच गटात कोरिया प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलिया व उझ्बेकिस्तान या अव्वल संघांनाही स्थान मिळाले.
कौलालंपूर येथील एएफसी हाऊस येथे हा ड्रॉ काढण्यात आला. ही स्पर्धा 16 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत बहरिनमध्ये होणार आहे. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱया चार संघांना 2021 मध्ये पेरू येथे होणाऱया फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत.
मागील वर्षी ताश्कंदमध्ये झालेल्या यू-16 पात्रता स्पर्धेत भारताच्या युवा संघाने गट ब मध्ये अग्रस्थान मिळवित अंतिम स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. त्या स्पर्धेत भारताच्या गटात यजमान उझ्बेकिस्तान, बहरिन, तुर्कमेनिस्तान यांचाही समावेश होता. भारतीय संघाने 3 सामन्यांतून 7 गुण मिळविताना 11 गोल नोंदवले तर प्रतिस्पर्ध्यांना फक्त एक गोल करू दिला होता. एएफसी यू-16 अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची भारताची ही सलग तिसरी व एकंदर नववी वेळ आहे.
भारत यू-16 संघाचे मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडीस म्हणाले की, ‘आपले खेळाडू या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज झाले आहेत. मात्र स्पर्धा सुरू होण्याआधीच संघाबाबत अपेक्षा व्यक्त करणे मला आवडत नाही. एक संघ म्हणून आपल्या युवकांनी खूपच सुधारणा केली आहे. त्यामुळे माझ्याप्रमाणे खेळाडूदेखील या स्पर्धेत खेळण्यास आतुर झाले असतील, याची मला खात्री आहे,’ असे ते म्हणाले.
मागील वर्षी ताश्कंदमध्ये झालेल्या पात्रता स्पर्धेत भारतीय संघाने उझ्बेक संघाशी मुकाबला केला असून तो सामना 1-1 असा अनिर्णीत राहिला होता. ‘या सामन्यात तो एक समतोल संघ असल्याचे आम्हाला दिसले होते. मात्र पात्रता स्पर्धा आणि अंतिम स्पर्धा यात बरेच अंतर असते. त्यामुळे बराच वेळ मिळाल्याने संघांत सुधारणा होणे साहजिकच आहे. मात्र आम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.
2018 मध्ये कौलालंपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत थेट पात्रता मिळविण्यासाठी भारताला फक्त एका विजयाची गरज होती. पण उपांत्यपूर्व फेरीत कोरिया प्रजासत्ताककडून एका गोलने पराभूत झाल्याने भारताची ही संधी हुकली होती. उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची भारताची ही दुसरी वेळ होती.