कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे फिफाचा निर्णय, अखिल भारतीय फुटबॉल संघटनेकडून स्वागत, नव्या रुपरेषेबाबत निर्णय नंतर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतात आयोजित फिफा यू-17 महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय फिफाने शनिवारी जाहीर केला. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये भारतातील पाच ठिकाणी खेळवली जाणार होती. ‘कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला आहे’, असे फिफाने यावेळी स्पष्ट केले.
महिलांची ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद व नवी मुंबई येथे दि. 2 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत होणे अपेक्षित होते. या स्पर्धेत 16 संघांचा सहभाग होता व आयोजक या नात्याने भारताला थेट प्रवेश देण्यात आला होता. यू-17 महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. पण, कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे आता या स्पर्धेबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.
फिफा-कॉन्फेडरेशन्सच्या कार्यकारिणीने शनिवारी कोव्हिड-19 च्या परिणामांची चर्चा करण्यासाठी कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत भारतातील स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सदर कार्यकारिणीने भारताने यू-17 विश्वचषक स्पर्धेबरोबरच पनामा/कोस्टारिका येथे आयोजित यू-20 महिला विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याची शिफारस केली होती. त्याला देखील फिफाने तत्काळ मंजुरी दिली. दोन्ही स्पर्धांच्या नव्या तारखा कालांतराने जाहीर केल्या जातील, असे फिफाने यावेळी नमूद केले.
तारखांचा पेच
फिफाच्या फायनल टुर्नामेंट लांबणीवर टाकल्या गेल्याने पुढील तारखांबाबत पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, महिला आंतरराष्ट्रीय मॅच कॅलेंडर तयार करण्यासाठी नवी उपसमिती नेमावी, असे यावेळी निश्चित करण्यात आले.
दरम्यान, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने ही स्पर्धा लांबणीवर टाकली जाणे आपल्याला अपेक्षितच होते, असे सांगितले.
निर्णय अपेक्षित होता
‘कोव्हिड-19 च्या महाघातक संकटामुळे अनेक स्पर्धा लांबणीवर
टाकल्या गेल्या आहेत. तीच बाब यू-17 महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला लागू झाली आहे.
त्यामुळे, आम्हाला त्यात आश्चर्याचे कारण वाटत नाही’, असे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे
महासचिव कुशल दास वृत्तसंस्थेशी बोलताना
म्हणाले.
युरोप व आफ्रिका तसेच काही अन्य कॉन्फेडरेशन्समधील पात्रता स्पर्धा होणे बाकी आहे. त्यामुळे, हा निर्णय अपेक्षितच होता, याचा दास यांनी येथे उल्लेख केला. ही स्पर्धा आता पुढील वर्षी होऊ शकेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
कार्यकारिणीने स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा हा निर्णय घेण्यापूर्वी सर्व कॉन्फेरेशन्समधील वरिष्ठ पदाधिकारी, महासचिव व व्यवस्थापनाचे मत आजमावले. यापूर्वी, फेब्रुवारी महिन्यात या स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली गेली होती व त्यानुसार, स्पर्धेतील अंतिम फेरी नवी मुंबईत आयोजित होणार होती.
पाच महिन्यांचा अवधी असतानाही स्पर्धा लांबणीवर का?
वास्तविक, या स्पर्धेला अद्याप पाच महिन्यांचा कालावधी बाकी होता आणि यादरम्यान परिस्थिती सुधारणे जवळपास निश्चित मानले तरी काही हरकत नव्हती. पण, प्रत्यक्षात या स्पर्धेच्या पात्रता फेऱयाच पूर्ण झाल्या नसल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याशिवाय फिफाकडे दुसरा पर्याय बाकी नव्हता. सध्याच्या घडीला फक्त आशियातील पात्रता स्पर्धा पूर्ण झाली असून त्यात जपान व उत्तर कोरिया या संघांनी पात्रता मिळवली आहे. आफ्रिका, युरोप, ओशेनिया, दक्षिण अमेरिका व मध्य, उत्तर अमेरिका, कॅरेबियन मधील उर्वरित पाच पात्रता स्पर्धाच होऊ शकलेल्या नाहीत. कोव्हिड-19 प्रकोपामुळे या सर्व ठिकाणी आयोजित या स्पर्धा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत.
आयोजन समितीकडूनही निर्णयाचे स्वागत
स्थानिक आयोजन समितीने फिफाच्या निर्णयाला सहमती दर्शवली व हा निर्णय होणे गरजेचे होते, असे नमूद केले. पण, त्याचवेळी नोव्हेंबरमध्येच ही स्पर्धा भरवण्याच्या दिशेने आपण महत्त्वाकांक्षी होतो, असे नमूद केले. नागरिकांचे स्वास्थ, सहभागी संघ, यजमान शहरे, कर्मचारी, येणारे चाहते व संबंधित संलग्न सर्व घटकांचा विचार करत फिफाने हा निर्णय घेतला, ते योग्यच आहे, असे आयोजन समितीने यावेळी स्पष्ट केले. भविष्यात ही स्पर्धा नव्याने आयोजित करण्यासाठी जे सहकार्य लागेल ते पूर्णपणे देण्यासाठी आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पूर्ण कटिबद्ध असू, असे अभिवचनही त्यांनी दिले.