अंतिम लढतीत लंकेवर 9 गडय़ांनी दणदणीत विजय
वृत्तसंस्था/ दुबई
भारताच्या युवा संघाने यू-19 आशिया चषक स्पर्धेतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना येथे झालेल्या अंतिम सामन्यात लंकेचा 9 गडय़ांनी धुव्वा उडवित आठव्यांदा जेतेपद पटकावले. भारतातर्फे अंगकृश रघुवंशीने शानदार अर्धशतक नोंदवताना नाबाद 56 धावा जमविल्या. गोलंदाजीत विकी ओसवालने 3, कौशल तांबने 2 बळी मिळविले.
लंकेने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारताच्या भेदक माऱयासमोर 33 व्या षटकाअखेर 7 बाद 74 अशी त्यांची केविलवाणी स्थिती झाली होती. पण मुसळधार पाऊस सुरू झाल्याने दोन तासाहून अधिक वेळ खेळ थांबवावा लागला. त्यानंतर 38 षटकांचा सामना खेळविण्याचा निर्णय घेतला गेला. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर लंकेने 38 षटकांत 9 बाद 106 धावा जमविल्या. नंतर डीएलएस पद्धतीनुसार भारताला 38 षटकात 102 धावा काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पण भारतीय युवकांनी 21.3 षटकांतच केवळ एक गडय़ाच्या मोबदल्यात 1 बाद 104 धावा जमवित विजयाचे उद्दिष्ट पार केले. सलामीवीर अंगकृश रघुवंशीने 67 चेंडूत नाबाद 56 धावा काढल्या.
भारताला या स्पर्धेत फक्त एकच पराभव स्वीकारावा लागला. सलामीच्या सामन्यातच त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागले होते. पण पाकला उपांत्य फेरीत लंकेने हरवित अंतिम फेरी गाठली होती तर भारताने बांगलादेशचा पराभव करून फायनल गाठली होती. यश धुळच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला या स्पर्धेतून यू-19 विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्याची चांगली संधी मिळाली. यू-19 विश्वचषक स्पर्धा 14 जानेवारीपासून वेस्ट इंडीजमध्ये सुरू होणार आहे.
रघुवंशीचे नाबाद अर्धशतक
गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडल्यानंतर माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने या स्पर्धेत बहरात असलेल्या हरनूर सिंगला लवकर गमविले. त्याला रॉड्रिगोने 5 धावांवर पायचीत केले. पण रघुवंशीने शैक रशीदच्या साथीने संयमी खेळ करीत भारताचा एकतर्फी विजय साकार केला. रशीदने 49 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. आधीच्या सामन्यांत फारशी प्रभावी कामगिरी करू न शकलेल्या रघुवंशीने बॅकफूट पंचवर चौकार वसूल केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. जलद गोलंदाजांविरुद्ध तो बॅकफूटवर खेळत होता तर स्पिनर्सविरुद्ध त्याने उत्तम पदलालित्य दाखविले. त्याच्या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता.
भारतीय गोलंदाज प्रभावी
तत्पूर्वी, सकाळी पाऊस पडला असल्याने वेगवान गोलंदाजीस पोषक वातावरण असूनही लंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि राजवर्धन हंगरगेकर व रवी कुमार या भारतीय सीम गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकल्याचे दाखवून दिले. रवी कुमारने पहिला बळी मिळविताना चमिंडू विक्रमसिंघेला चौथ्या षटकात बाद केले. मिडविकेटला उत्तुंग फटका मारताना त्याचे टायमिंग चुकले आणि चेंडू थर्डमॅनवरील राज बावाच्या हातात गेला. विक्रमसिंघेचा जोडीदार शेव्हॉन डॅनियलही बावाला पुल करण्याच्या प्रयत्नात यष्टिरक्षकाकरवी झेलबाद झाला. 11 व्या षटकात त्यांची स्थिती 2 बाद 11 अशी झाली. पहिल्या दहा षटकांत हंगरगेकरने सर्वात प्रभावी मारा केला. भारतीय गोलंदाजांविरुद्ध लंकन फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. ऑफस्पिनर कौशल तांबे (23 धावांत 2) व डावखुरा स्पिनर विकी ओसवाल (11 धावांत 3) यांचे चेंडू अधूनमधून बरेच वळत होते. ओसवालने एकाच षटकात दोन बळी मिळविल्याने लंकेची स्थिती 7 बाद 57 अशी नाजूक झाली होती. दुनित वेलागले स्लॉग स्वीप करताना बाद झाला तर दोन चेंडूनंतर रानुदा सोमरत्ने ओसवालच्या आर्मबॉलवर पायचीत झाला. लंकेचा डाव 100 धावांच्या आत गुंडाळणार असे वाटत असताना मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने खेळ थांबवावा लागला. नंतर 5 षटकांत लंकेने 2 गडय़ांच्या मोबदल्यात 32 धावांची भर घातली. शेवटच्या चेंडूवर हंगरगेकरने मतीशा पथिरानाला बाद केले. स्क्वेअरलेग सीमारेषेवर रघुवंशीने सूर मारत हा अप्रतिम झेल टिपला.
संक्षिप्त धावफलक ः यू-19 लंका 38 षटकांत 9 बाद 106 (सदिशा राजपक्षे 14, रवीन डिसिल्वा 15, यासिरु रॉड्रिगो नाबाद 19, मतीशा पथिराना 14, विकी ओसवाल 3-11, तांबे 2-23, राज बावा 1-23, रवि कुमार 1-17, हंगरगेकर 1-26), यू-19 भारत 21.3 षटकांत 1 बाद 104 (रघुवंशी 67 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 56, हरनूर 5, रशीद 49 चेंडूत नाबाद 31, रॉड्रिगो 1-12).