वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या यू-19 आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा अखेरच्या चेंडूवर पराभव करीत 2 गडय़ांनी रोमांचक विजय मिळविला.
भारताच्या 238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सामनावीर मुहम्मद शेहजादने 81 व अखेरच्या टप्प्यात अहमद खानने (19 चेंडूत नाबाद 29) केलेल्या फटकेबाजीमुळे पाकला शेवटच्या चेंडूवर विजय मिळविता आला. शेवटच्या षटकात पाकला 7 धावांची गरज असताना रविकुमारने झीशान जमीरला पहिल्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर 2 ते पाचव्या चेंडूवर 6 धावा निघाल्या आणि शेवटच्या चेंडूवर अहमद खानने चौकार मारत विजय साकारला.
त्याआधी भारताचा डाव 49 षटकांत 237 धावांत आटोपला. पाकचा मध्यमगती गोलंदाज झीशान जमीरने 60 धावांत 5 बळी मिळविले. त्यानंतर पाकने 50 षटकांत 8 बाद 240 धावा जमविल्या. भारताच्या डावात हरनूर सिंगने 59 चेंडूत 46, यष्टिरक्षक आराध्या यादवने 83 चेंडूत 50, कौशल तांबेने 32, राजवर्धने हंगरगेकरने 20 चेंडूत 33 धावा फटकावल्या. पाकतर्फे माझ सदाकतने 29, शेहजादने 81 (4 चौकार, 5 षटकार) धावा जमविताना दुसऱया गडय़ासाठी 64 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इरफान खानने 32, रिझवान मेहमूदने 29 धावा जमवित सहाव्या गडय़ासाठी 47 धावांची भागीदारी केली तर कासिम अक्रमने 22 धावा जमविल्या. भारताच्या राज बावाने 56 धावांत 4 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः यू-19 भारत 49 षटकांत सर्व बाद 237 (आराध्या यादव 50, हरनूर सिंग 46, हंगरगेकर नाबाद 33, तांबे 32, झीशान जमीर 5-60, अवैस अली 2-43), यू-19 पाक 50 षटकांत 8 बाद 240 (मुहम्मद शेहजाद 81, इरफान खान 32, राज बावा 4-56).