दोन्ही आशियाई संघ विजयश्री खेचून आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी, कोरोनावर मात केलेले भारतीय खेळाडू लढतीसाठी उपलब्ध
ओस्बोर्न (अँटिग्वा) / वृत्तसंस्था
यू-19 आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चारवेळचा विजेता भारतीय संघ विद्यमान विजेत्या बांगलादेशविरुद्ध लढतीसाठी आमनेसामने उभे ठाकेल, त्यावेळी कोरोनातून सावरलेले मुख्य खेळाडू उपलब्ध असतील, ही भारतीय संघासाठी जमेची बाजू असणार आहे. आजची महत्त्वपूर्ण उपांत्यपूर्व लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता खेळवली जाईल.
भारतीय पथकातील 17 पैकी अर्धा डझन खेळाडू यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने साखळी फेरीतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर फेकले गेले आणि भारतीय पथकात अक्षरशः खळबळ उडाली. कोरोनाची बाधा झालेल्या या 6 खेळाडूंमध्ये कर्णधार यश धुलचा देखील समावेश राहिला. या सर्व खेळाडूंना आयर्लंडविरुद्ध लढतीपूर्वी आयसोलेशनमध्ये जावे लागले. या 6 पैकी 4 खेळाडू आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले. शिवाय, नंतर युगांडाविरुद्ध शेवटच्या साखळी सामन्यातही ते खेळू शकले नाहीत. मात्र, सुदैवाने राखीव खेळाडूंची फळी देखील तितकीच मजबूत असल्याने भारतीय संघाला जेमतेम 11 खेळाडूंचा संघ उतरवूनही बाद फेरी गाठण्याचे लक्ष्य गाठता आले.
धुलच्या गैरहजेरीत निशांत सिंधूने भारतीय संघाचे नेतृत्व साकारले. आयर्लंडविरुद्ध लढतीत कसाबसा 11 खेळाडूंचा संघ उतरवू शकलेल्या भारताने गाजवलेले वर्चस्व लक्षवेधी ठरले. बरेच खेळाडू पूर्ण तंदुरुस्त आहेत आणि आजच्या लढतीसाठी ते उपलब्ध असतील, असे बीसीसीआयमधील सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
कर्णधार धुल, उपकर्णधार शैक रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव व मानव पारख हे खेळाडू आयर्लंडविरुद्ध लढतीपूर्वी आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. धुल व रशीद हे दोघेही महत्त्वाचे फलंदाज बहरात असल्याचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामी लढतीत दिसून आले होते. त्यांच्या गैरहजेरीत युगांडाविरुद्ध आक्रमक शतके झळकावण्यात यशस्वी ठरलेल्या अंगक्रिश रघुवंशी व अष्टपैलू राज बावा यांचे मनोबलही येथे उत्तम उंचावलेले असेल.
डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवालने भारतीय संघातर्फे सर्वाधिक 7 बळी घेत भेदक मारा साकारला आहे. आणखी एक डावखुरा स्पिनर सिंधूने देखील काटेकोर मारा करताना 4 बळी घेतले. त्याची षटकामागील इकॉनॉमी 2.76 इतकी राहिली. याशिवाय, बांगलादेशी फलंदाजांना राजवर्धन हंगरगेकरच्या वेगवान माऱयाला सामोरे जाणे देखील तितकेच आव्हानात्मक ठरु शकते. आजची ही लढत 2020 यू-19 विश्वचषकाच्या फायनलची रि-मॅच असेल. बांगलादेशने त्यावेळी भारताला पराभवाचा झटका देत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. बांगलादेशचा विद्यमान कर्णधार रकिबूल हसन त्या संघात समाविष्ट होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची भारताकडे येथे संधी असेल.
अगदी अलीकडे, युएईमध्ये संपन्न झालेल्या आशिया चषक उपांत्य सामन्यात भारताने बांगलादेशला नमवत नंतर जेतेपदावर आपली मोहोर उमटवली होती. भारताने यंदा बाद फेरीत सहज प्रवेश मिळवला असला तरी बांगलादेशला मात्र इथवर येण्यासाठी बरेच झगडावे लागले. सलामी लढतीत बांगलादेशला इंग्लंडने पराभूत केले. नंतर कॅनडा व युएई या संघांवर मात करत बांगलादेशचा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला. आज या दोन्ही आशियाई संघांची एकतर्फी विजयासह आगेकूच करण्याची महत्त्वाकांक्षा असेल.
भारत ः यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शैक रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, मानव पारख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्तवाल, गर्व संगवान, दिनेश बाना, आराध्य यादव, राज बावा, वासू वत्स, रवी कुमार.
प्रतिस्पर्धी संघ
बांगलादेश ः रकिबूल हसन (कर्णधार), अब्दुल्लाह अल ममून, अरिफुल इस्लाम, मोहम्मद फहीम, महफिजूल इस्लाम, रिपॉन मोंडल, नईमूर रोहमन, तन्झिम हसन सकीब, नबिल, ऐच मोल्लाह, अशिकूर झमन, इफ्तकार होसेन इफ्ती, एसएम मेहरुब, मुस्फिक हसन, तहजिबूल इस्लाम.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 6.30 पासून.