ब्लोमफौंटेन / वृत्तसंस्था
आयपीएलमधील पाच नवे खेळाडू समाविष्ट असलेल्या युवा भारतीय संघाची आज (दि. 19) आयसीसी 19 वर्षाखालील युवा विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध सलामीची लढत होत आहे. भारतीय युवा संघ या स्पर्धेत विद्यमान जेता असून मागील चार आवृत्तीत त्यांनी दोनवेळा जेतेपदे व एकदा उपजेतेपद संपादन केले आहे.
भारतीय युवा संघाने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विदेशीय मालिका जिंकल्यानंतर चौरंगी स्पर्धा जिंकली. शिवाय, सराव सामन्यात अफगाणिस्तान संघाला पराभूत केले. अफगाणिस्ताननेच या विश्वचषक स्पर्धेतील सलामी लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर युवा क्रिकेट संघाचा चेहरामोहराच बदलून गेला असल्याचे दिसून आले असून या पार्श्वभूमीवर यंदाच्या युवा विश्वचषकातही भारतीय संघाकडून विशेष अपेक्षा आहेत.
यंदाच्या आवृत्तीत यशस्वी जैस्वाल, कर्णधार प्रियम गर्ग, कार्तिक त्यागी, रवी बिश्नोई यांच्याकडून दमदार कामगिरीची भारतीय संघाला अपेक्षा आहे.