बुडा आयुक्तांच्या आश्वासनानंतर जमीन मालकांचे आंदोलन मागे
प्रतिनिधी/ बेळगाव
बुडाच्या वतीने कणबर्गी येथील जागेत वसाहत योजना राबविण्यासाठी भू संपादन करण्यात आले आहे. जमिनीचा ताबा घेऊन वर्ष उलटले तरी योजनेचा पत्ता नाही त्यामुळे संतापलेल्या जमीन मालकांनी सोमवारी बुडा कार्यालयाला धडक देऊन टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. मात्र येत्या काही दिवसात योजनेचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांनी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
कणबर्गी योजना राबविण्यासाठी बुडाने 2007 साली भुसंपादनाची नोटीस पाठविली होती. 12 वर्षानंतर बुडाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून 130 एकर जमिन ताब्यात घेतली आहे. सहा महिन्यात योजनेचे काम मार्गी लागेल असे जमिन मालकांना सांगण्यात आले होते. तसेच 50 : 50 या तत्वानुसार विकसीत भुखंड जमिन मालकांना देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे 110 एकर शेतजमिन मालकांनी योजना राबविण्यास सहमती दर्शवून संमतीपत्र दिले होते. तसेच मागील वषी जमिनीचा ताबा बुडाने घेतला होता. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप योजनेचा पत्ता नाही. कोणतीही विकास कामे किंवा योजना राबविण्याचे काम सुरू करण्यात आले नाही. 6 महिन्यात विकासकामे सुरू करून विकसीत जमिनीपैकी 50 टक्के भुखंड देण्यात येईल असे सांगण्यात आल्याने अनेक जमिन मालक भुखंडाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र योजनेचे काम रखडल्याने शेतकऱयांकडे जमिनी नाही आणि भुखंडही नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. योजना राबवून भूखंड द्या अन्यथा जमिनी परत करा अशी मागणी करून निवेदन देण्यात आले होते. पण याबाबत ही योजना लवकरच राबवू असे सांगण्यात आले होते. त्यामुळे जमिनी मालकांनी प्रतिक्षा केली होती. मात्र वर्ष उलटले तरी कोणतेच काम सुरू नसल्याने नगरविकास मंत्र्यांच्या पाहणी दौऱयावेळी भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. योजनेला लवकर मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. हीयोजना राबविण्याचे काम रखडल्याने, संमती दिलेल्या जमिन मालकांनी बुडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय घेऊन सोमवारी बुडा कार्यालयाला धडक दिली.
योजनेचे काम प्रगतीपथावर असून, शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात योजनेची फाईल कार्यालयात दाखल होईल. त्यानंतर योजनेचे काम मार्गी लागणार आहे. पण जमिन मालकांना भुखंड मंजुर करण्यासाठी किमान 3 महिन्याचा कालावधी लागणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर रस्ते निर्माण करणे, गटारीचे बांधकाम, डेनेज वाहिन्या, जल वाहिन्या, विद्युत वाहिन्या घालने अशी विविध विकास कामे राबविण्यास प्रारंभ होणार आहे. त्यानंतरच भुखंड उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे जमिनी मालकांनी यापूर्वी सहकार्य केले असून, आणखीन काही महिने सहकार्य करावे असे आवाहन बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांनी केले. त्यामुळे टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना सिद्राय शिग्गीहळ्ळी, बाळूगौडा पाटील, शिवाजी सुळगे पाटील, अजित पाटील, भैरगौडा पाटील, शिवाजी मालाई, प्रकाश शिग्गीहळ्ळी, दादा नावगेकर, मनोहर मालाई, बी. पी. मुचंडीकर, सोमनाथ मालाई, निर्मला शिग्गीहळ्ळी, वंदना पाटील आदिंसह कणबर्गी परिसरातील नागरिक उपस्थित होते.