केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती : जीपीएस प्रणालीद्वारे वाहनधारकाच्या बँक खात्यातून टोलवसुली होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात वाहनांच्या मुक्त वाहतुकीसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या दोन वर्षात भारताला ‘टोलनाकामुक्त’ करण्यात येईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन वर्षात वाहनांचा टोल फक्त वाहनधारकाच्या लिंक केलेल्या बँक खात्यातूनच वजा केला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.
असोचॅम फाऊंडेशन सप्ताह कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी टोलनाके बंद होण्याचे संकेत दिले. रशियन सरकारच्या मदतीने भारत लवकरच जीपीएस प्रणालीला अंतिम स्वरुप देणार आहे. यासंबंधीचा करार झाल्यानंतर दोन वर्षांत भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल, असा दावा गडकरी यांनी केला आहे. सध्या देशातील सर्व व्यावसायिक वाहने ट्रकिंग सिस्टमने सुसज्ज आहेत. त्याचबरोबर सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम तंत्रज्ञान बसविण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. या दोन्ही पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्यानंतर वेगवेगळय़ा मार्गांवरील टोलनाके हळूहळू बंद केले जाणार आहेत.
1 लाख 34 हजार कोटींपर्यंत वाढेल टोलचे उत्पन्न
जीपीएस तंत्रज्ञान वापरल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा (एनएचएआय) चा टोल महसूल पाच वर्षात वाढून 1.34 ट्रिलियनपर्यंत पोहोचू शकेल. टोल वसुलीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंबंधी नुकतीच रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे अध्यक्ष आणि ‘एनएचएआय’ यांच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन सादरीकरण करण्यात आले. त्यात मिळालेल्या माहितीनुसार येत्या पाच वर्षांत देशात टोलचे उत्पन्न 1 लाख 34 हजार कोटी होईल, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
एक वर्षापूर्वी फास्टॅग अनिवार्य
देशभरात वाहनांची मुक्त हालचाल करण्यासाठी सरकार हे विशेष पाऊल उचलत आहे. गेल्या एका वर्षात केंद्र सरकारने देशातील सर्व टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केले होते. फास्टॅगच्या अनिवार्यतेनंतर इंधनाची बचत होण्याबरोबरच प्रदूषणावरही नियंत्रण आले आहे.
कॅशलेस व्यवहारास चालना
इलेक्ट्रॉनिक टोल संकलन उपकरणांच्या वापरामुळे कॅशलेस व्यवहारास देखील चालना मिळाली आहे. तसेच टोलवसुलीतही पारदर्शकता दिसून आली आहे. गेल्या काही महिन्यात फास्टॅगचा वापर लक्षणीय वाढला आहे. ‘एनएचएआय’ नोव्हेंबरमध्ये जारी केलेल्या उत्त्पन्नाच्या आकडेवारीनुसार टोल संकलनात फास्टॅगचे योगदान वाढले आहे. या माध्यमातून मागील वर्षी 70 कोटी असलेले उत्पन्न यंदा 92 कोटींपर्यंत वाढले आहे.