ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यात येतील. टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. लोक जेवढा रस्तेप्रवास करतील, तेवढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना गडकरी बोलत होते.
पुढे ते म्हणाले, जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे.
टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेवढा हायवेचा प्रवास केला किंवा जेवढा रस्ता वापरला तेवढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.