भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, सहप्रभारी जरदोश, रेड्डी यांची उपस्थिती : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती,विधानसभा निवडणुकीच्या तयारीला गती
प्रतिनिधी /पणजी
गुजरातचे नवे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यास हजर राहण्याच्या निमित्ताने आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तसेच मुंबईत गोवा भाजपचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या 20 सप्टेंबरला गोव्यात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरले असून त्यात प्रभारी फडणवीस यांच्यासह सहप्रभारी दर्शना जरदोश तसेच रेड्डी हजर असतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीची गती आता वाढत आहे, असे सांगताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, येत्या 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात असणार आहेत. गोव्याचे प्रभारी म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा गोव्याला निश्चितच मिळणार आहे, असे ते म्हणाले. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना मंचावर स्थान देण्यात आले होते. त्यावेळी मंचावर भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या नेत्यांनी भेट घेऊन आपली गोव्यासंबंधी चर्चा झाली. या चर्चेनंतर आता गोव्यातील पक्ष कार्याला गती मिळणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी होणाऱया गोव्यात होणाऱया बैठकीत गोव्याच्या सहप्रभारी दर्शना हजर राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
काँग्रेस प्रवेशाचा गुंता
काँग्रेस पक्ष अनेकांना आता पक्षात प्रवेश देत सुटला असून रोज काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या बातम्या झळकत असतात यासंबंधी मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसवाल्यांनी जेवढय़ा लोकांना प्रवेश द्यायचा असेल त्यांना द्यावा भाजपवर त्याचा कोणताच परिणाम होणार नाही, असे डॉ. सावंत म्हणाले.
ज्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला ते यापूर्वी त्याच पक्षात होते. त्यामुळे घरच्याघरी प्रवेशाची हवा करूनही काहीच परिणाम होणार नाही वरून मतदारसंघात गुंता वाढून त्याचा अधिक फायदा भाजपलाच होणार असल्याचे ते म्हणाले.
पुढचे सरकार भाजपचेच
पुढील राजकीय डावपेचासंबंधी त्यांच्याकडे विचारणा केली असता राजकीय डावपेच चालूच असतात पण येत्या विधानसभेत भाजपचीच परत सत्ता असेल अशी आपल्याला खात्री आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. भाजप सरकारने आतापर्यंत केलेल्या कार्याची पोचपावती मतदार देतीलच व यावेळी भरघोस बहुमताने भाजप सत्तेत असेल, असे त्यांनी सांगितले.