रत्नागिरी जिल्हय़ातील जहाज कर्मचाऱयांचाही समावेश : मसालाकिंग डॉ.धनंजय दातार यांचे प्रयत्न : रत्नागिरी, दापोली, मंडणगड तालुक्यातील नागरिकांचा समावेश
प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेल्या 20 जहाज कर्मचाऱयांची अखेर सुखरुप सुटका झाली आहे. यामध्ये 14 भारतीय, 5 बांगलादेशी व एका इजिप्शियन तसेच रत्नागिरी जिह्यातील नागरिकांचाही समावेश आहे. या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईतील अल अदील ट्रेडिंग समूहाचे अध्यक्ष मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
जहाज कर्मचाऱयांतील भारतीयांमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरचे संदीप बाळू लोहार (खडकेवाडा, ता. कागल), नीलेश धनाजी लोहार (कौलव, ता. राधानगरी), फिरोज नसरुद्दीन झारी (रत्नागिरी), अहमद अब्दुल गफूर वाकणकर (दापोली), तन्मय राजेंद्र माने (मांडवा, अलिबाग), दाऊद महमूद जोवरक (दापोली, मंडणगड), गोव्यातील चेतन हरिश्चंद्र गवस, तामिळनाडूमधील मनिराज मरीप्पन, मोहनराज थानीगचलम व विल्लीयम निकामदेन, पुदुच्चेरीमधील प्रवीण थम्मकरनताविडा, केरळमधील अब्दुल वाहब मुस्तहबा व पश्चिम बंगालमधील हिरोन शेक, उत्तर प्रदेशमधील संजीव कुमार यांचा समावेश आहे.
येमेनमध्ये सध्या भारताचा दूतावास नसल्याने शेजारच्या जिबोती देशातील भारतीय दूतावास या कर्मचाऱयांना तात्पुरते पासपोर्ट तसेच येमेनी प्रशासनातर्फे व्हिसा मंजुरी मिळवून देण्याबाबत अखंड प्रयत्नशील आहे. ओमानस्थित एका परदेशी जहाज वाहतूक (शिपिंग) कंपनीत काम करण्यासाठी हे 20 जण गेल्या जानेवारीत मस्कतला गेले होते. कंपनीला सौदी अरेबिया देशाचे वाहतुकीचे कंत्राट मिळाल्याने ते 2 जहाजांतून 3 फेब्रुवारीला ओमानहून सौदी याम्बो बंदरापर्यंत प्रवासासाठी रवाना झाले. 12 फेब्रुवारीला वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्राने यातील एका जहाज बुडाले. यानंतर वाचलेल्या दुसऱया जहाजातून सर्वजण पुढे निघाले. परंतु लवकरच त्या जहाजालाही खराब हवामानामुळे नांगर टाकून एका जागी थांबावे लागले.
दुर्दैवाने त्यांनी जहाज नांगरलेली जागा येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात होती. येमेन व सौदी अरेबियात संघर्ष व चकमकी सुरू असल्याने येमेनी तटरक्षकांनी जहाजावर इशारादर्शक गोळीबार केला आणि नंतर सर्व कर्मचाऱयांना अटक करुन येमेनच्या साना शहरातील एका हॉटेलात स्थानबद्ध केले. त्यांचे पासपोर्ट, मोबाईल, कागदपत्रे व रोख रक्कम जप्त केले. डॉ. दातार यांनी त्वरित सक्रिय होऊन जिबोतीमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून अथक पाठपुरावा केला. या कामी त्यांना जिबोतीतील भारतीय राजदूत अशोक कुमार, पुण्यातील धनश्री पाटील व माजी ज्येष्ठ राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांचे मोलाचे सहाय्य झाले. तसेच दुबईतील डॉ. सुनील मांजरेकर यांचेही प्रयत्न सफल झाले. अखेर गेल्या आठवडय़ात या सर्व कर्मचाऱयांची सुटका झाली आहे. ते आता जिबोतीमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत. भारतीय दूतावासाच्या मदतीने व्हिसा व अन्य मंजुरी मिळताच ते लवकरच सानाहून एडनमार्गे मुंबईला परततील.
डॉ. धनंजय दातार यांनीही या कर्मचाऱयांच्या सुटकेबद्दल आनंद प्रकट केला आहे. कोणतीही चूक नसताना आपल्या भारतीय बांधवांना परदेशी भूमीवर हालअपेष्टा सहन करत अडकून पडणे, मला पटत नाही. सध्याच्या आव्हानाच्या काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबासमवेत सुरक्षित व समाधानी असावे, याच अपेक्षेने आम्ही या मोहिमेत सक्रिय आहोत. जिबोतीमधील भारतीय राजदूत अशोक कुमार व निवृत्त भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी केलेल्या मदतीबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. या कर्मचाऱयांना त्यांच्या कंपनीने पगाराची काहीच रक्कमही दिलेली नाही. त्यांना न्याय्य मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ओमानमधील कामगार मंत्रालयाशी संपर्क साधणार असून या कर्मचाऱयांना कायदेशीर मदत मिळवून देणार असल्याचे सांगण्यात आले.
डॉ. दातार यांचे उपकार कधीही विसरणार नाही
दहा महिन्यांच्या कैदेनंतर सुटका झाल्याने सर्व कर्मचाऱयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. डॉ. दातार यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नीलेश लोहार म्हणाले, काहीही चूक नसताना अटक होणे, दहा महिने स्थानबद्ध राहणे, कुटुंबाशी किंवा स्वदेशाशी संपर्क न होता अनोळखी देशात उपासमारीत दिवस काढणे आणि अनिश्चिततेची तलवार डोक्यावर असणे, हा साराच अनुभव फार भीतीदायक होता. डॉ. दातार यांनी आम्हाला परतीच्या प्रवासासाठी आर्थिक आधार पुरवला आहे. त्यांचे हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही.
नीलेश लोहार, राधानगरी-कोल्हापूर