प्रतिनिधी/ उंब्रज / पाल
‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असाचा जयघोष करत खोबरे भंडाऱयांची उधळण करत लाखो भाविकांच्या उपस्थितीत कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबा देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडली. सुमारे सहा लाखांवर भाविकांच्या उपस्थितीत मल्हारी व म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर पार पडला. यात्रेनिमित्त भाविकांनी तारळीच्या वाळवंटात एकच गर्दी केली. दरम्यान, मंदिराच्या प्रवेशद्वारावरील गर्दीवर नियत्रंण मिळवताना पोलिसांची अक्षरशः दमछाक झाली.
ऐतिहासिक पाल नगरीतील खंडोबा देवाच्या यात्रेचा बुधवारी 8 रोजी मुख्य दिवस होता. जिल्हा प्रशासनाने यात्रेत वेळोवेळी केलेल्या बदलांमुळे यात्रा सुरळीत पार पडली. मिरवणूक मार्गावर पडणारा ताण कमी झाल्यानेही भाविकांना त्रास जाणवला नाही. मात्र दर्शन घेता न आल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाचा हा प्रयोग यशस्वी झाला. तारळी नदीपात्रातील दक्षिणोत्तर बाजू भंडारा, खोबऱयाच्या उधळण्यासाठी भाविकांच्या गर्दीने खचाखच भरली होती. पाल नगरीत खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱयाच्या उधळणीने पिवळा धमक झाला.
खंडोबा व म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासनकाठय़ा, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेल्या शाही मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी 2. 45 वाजण्याच्या सुमारास खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी 4 वाजता देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटात बांधून अंधार दरवाजाजवळ आले. रथात विराजमान झाले व तेथून मुख्य मिरवणुकीस सुरूवात झाली.
मानकऱयांच्या फुलांनी सजवलेल्या अबदागिरी, चोपदाराचा घोडा, सासन काठय़ा, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया व म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा, खोबऱयाची उधळण करत सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत देवाचे दर्शन घेतले. नेहमी मुख्य मिरवणूक सुरु होताच या मार्गावर भाविकांची गर्दी होते. यावर्षीही ही गर्दी उसळली. त्यामुळे पोलीस प्रशासनाची भंबेरी उडाली. याठिकाणी जमलेली गर्दी थोपवण्यासाठी भाविकांना खाली बसवावे लागले. मागील तीन वर्षापासून देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व प्रशासन यांनी यात्रेपूर्व केलेल्या योग्य नियोजनामुळे तसेच समांतर पूल उभारल्याने तारळी नदीवरील मुख्य पुलावरील गर्दीवर नियंत्रण राहण्यासाठी मदत झाल्याचे दिसून आले.
सायंकाळी वाळवंटातून देवाची शाही मिरवणूक मारुती मंदिरमार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले. देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले व पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा मोठय़ा थाटात पार पडला. तर देवाच्या या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मराठी, कन्नड, तेलगू भाषिकांच्या चेहऱयावर जाणवत होते.
यात्रेसाठी पाल ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव, उंब्रज पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, जिल्हा प्रशासन यांनी परिश्रम घेतले