कोकरूड वार्ताहर
येळापुरच्या वाघ दऱ्यात असणाऱ्या सात गव्यांनी आणि वीस पेक्षा जास्त डुकरांनी ५० हेक्टर पेक्षा जास्त ऊस, शाळू, हायब्रीड आदी पिकांचे नुकसान केले असून वनविभागाने नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तातडीने भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चांदोली अभयारण्याच्या लगत असणाऱ्या गुढे, पाचगणी, मानेवाडी, मणदूर,आरळा,मेणी,येळापुर तसेच वाडी-वस्तीवर असणाऱ्या गावात दररोज जंगलातील गवे, बिबटे, डुकरे या सारखी जनावरे येऊन शेळी, बकरी, कुत्रे, गायी-म्हैशी याच्यावर हल्ले करण्या बरोबरच शेतात उभे असणाऱ्या पिकांचे नुकसान करत आहेत. गुढे-पाचणगी पठारावर गव्यांचे दोन कळप आहेत. तर येळापुर येथील वाघ दऱ्यात सात गव्यांचा कळप असून वीस पेक्षा जास्त डुकरे असल्याने ऊस, शाळू, गहू, हरभरा, हायब्रीड आदी पिकांचे गव्या कडून कणसे खाल्ली जात आहेत. तर डुकरा कडून पिकांची नासधूस सुरु आहे.
शिराळा पश्चिम भागात दररोज गवे आणि डुकरांच्या कडून पिकांचे नुकसान होत असून ५० हेक्टर पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. दररोज रात्री दहा नंतर गवे आणि डुकरांचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर पिकांची राखणी करावी लागत आहे.तरी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी होत आहे.